‘कथानक ही मराठी चित्रपटांची स्ट्रेंथ!’- दिग्दर्शक आदित्य सरपोतदार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 01:19 PM2018-01-28T13:19:25+5:302018-01-28T18:55:41+5:30
अबोली कुलकर्णी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे मराठी इंडस्ट्रीतलं मोठ्ठं नाव. ‘फास्टर फेणे’, ‘उलाढाल’,‘फास्टर फेणे’,‘सतरंगी रे’ यासारख्या अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट ...
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे मराठी इंडस्ट्रीतलं मोठ्ठं नाव. ‘फास्टर फेणे’, ‘उलाढाल’,‘फास्टर फेणे’,‘सतरंगी रे’ यासारख्या अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट दिग्दर्शन त्यांनी केलं. युवाकेंद्रित चित्रपटांचे दिग्दर्शन, मराठी संस्कृतीची जपणूक आणि शिकवण देणारं कथानक, आशयघन चित्रपट ही वैशिष्ट्ये असलेले दिग्दर्शन म्हणून आपण त्यांना प्रामुख्याने ओळखतो. ते आता झी युवा वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या डान्सवर आधारित रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. यानिमित्ताने आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...
* ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या डान्स आधारित रिअॅलिटी शोबद्दल काय सांगाल? यात तुम्ही परीक्षकाच्या भूमिकेत आहात?
- झी युवा वाहिनीवर २४ जानेवारीपासून ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा डान्सवर आधारित रिअॅलिटी शो सुरू झाला असून या शोविषयी सांगायचं झालं तर, हा मंच महाराष्ट्रातील ४ वर्षांवरील तमाम नृत्य प्रेमींसाठी खुला आहे. मुख्य म्हणजे त्यावर कसलेही बंधन नाही. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. त्यात महत्वाची गोष्ट ही आहे, या स्पर्धेत पुढे जायचं असेल तर, तुम्हाला उत्कट आणि
आणि कल्पक डान्सर असणं गरजेचं आहे. त्यात सोलो, डुएट आणि ग्रुप असल्यामुळे स्पर्धकांची एकमेकांशी स्पर्धा करू शकत नाही. मी प्रथमच परीक्षकाच्या भूमिकेत यात दिसतो आहे. मला आनंद आहे की, महाराष्ट्रातील हे छुपं टॅलेंट या शोच्या निमित्ताने मला बघावयास मिळते आहे.
* शोच्या युएसपीविषयी काय सांगता येईल?
- ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा मंच ४ वर्षांवरील सर्व टॅलेंटेड स्पर्धकांसाठी खुला आहे आणि नृत्य शैलीचे कसलेही बंधन सुद्धा नाही. त्यामुळे टॅलेंट शोधण्यासाठी हा मंच सर्वाेत्कृष्ट आहे. हा मंच ज्यांच्या रक्तात डान्स आणि मनात महाराष्ट्र आहे त्यांच्यासाठी आहे. या मंचावर आलेला प्रत्येक डान्सर अतिशय टॅलेंटेड आहे. जेव्हा ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात तो त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल तेव्हा त्याला भविष्यात यशस्वी डान्सर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या कार्यक्रमात सर्वच टॅलेंटेड डान्सर असल्यामुळे स्पर्धेचा दर्जा हा प्रत्येक
फेरीबरोबर वाढत चालला आहे. खरंतर हाच या शोचा युएसपी म्हणता येईल.
* तुमच्यासोबत परीक्षक म्हणून फुलवा खामकर आणि सिद्धार्थ जाधव हे देखील असणार आहेत. कशी आहे तुमची बाँण्डिंग?
- खरं सांगायचं तर, फुलवा आणि सिद्धार्थ हे माझे खूप चांगले मित्र आहेत. सगळयांत महत्त्वाचं ते दोघे माणूस म्हणून खूप उत्कृष्ट आहेत. मंचावरची आमची बाँण्डिंग खूप चांगली आहे. आम्ही तिघांनीही आमच्या परीक्षणाच्या पद्धती वाटून घेतल्या आहेत. फुलवा टेक्निक-डान्स फॉर्म बघते, डान्सला एनर्जी लागते आहे की नाही, स्पर्धक किती उत्साहाने मेहनतीने स्वत:चा डान्स करतोय हे सिद्धार्थ बघतो आणि त्या डान्सरची स्टोरी टेलिंग आणि सादर करण्याची पद्धत मी बघतो. त्यामुळे परीक्षण करताना हे तिन्ही पैलू आम्हाला कळतात व सर्वोत्तम परफॉर्मर शोधणे सोपे जाते.
* सध्या वेगवेगळया चॅनेलवर डान्स आधारित शो सुरू आहेत. काय वाटतं की, अशा शोंमधून खरं टॅलेंट बाहेर येतं का?
- खरंतर महाराष्ट्रात असे बरेच जण आहेत की, जे एका संधीच्या शोधात आहेत. त्यांना संधी मिळवून देण्याचं काम आम्ही या शोच्या निमित्ताने केलं. असे शो अनेक चॅनेल्सवर सुरू आहेत. पण, मला असं वाटतं की, होतकरू आर्टिस्टना आपण अशा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून एक स्टेज मिळवून देत असतो. आणि ही एक चांगली बाब आहे. केवळ शो जिंकून मिळणाºया पारितोषिकापेक्षा तुम्ही जी मेहनत करता ती जास्त महत्त्वाची आणि तुमच्याजवळ ती अखंड राहणार आहे.
* तुमचे आत्तापर्यंतचे बरेच चित्रपट हे युवाकेंद्रित असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामागची मानसिकता काय ?
- मला असं वाटतं की, युवापिढी ही समाजाचे भवितव्य असते. युवक काय विचार करतात, त्यांचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे? हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या सर्वांत चित्रपट हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तुम्ही चित्रपटाचा आशय कसा निवडता, त्याचे कंटेंट काय असेल? हे ठरवणं जास्त महत्त्वाचं असतं. आपली संस्कृती, आपली नितीमूल्ये जर युवापिढीपर्यंत पोहोचवायची असतील तर चित्रपट हे माध्यम अत्यंत उत्तम आहे. त्यामुळे मी युवाकेंद्रित चित्रपट बनवणं जास्त महत्त्वाचं समजतो.
* तुमचे वडील अजय सरपोतदार यांना तुम्ही चित्रपटसृष्टीतच करिअर करावंसं असं वाटतं होतं याबद्दल काय सांगाल?
- खरंतर अभिनय क्षेत्रातील माझी ही चौथी पिढी आहे. मी याच क्षेत्रात करिअर करावं असं माझ्या वडिलांना फार मनापासून वाटत होतं. मात्र, त्यांनी कधीही माझ्यावर दबाव टाकला नाही. याउलट ते मला म्हणायचे की, तू प्रत्यक्ष सेटवर येऊन शिक्षण घे. प्रॅक्टिकल शिक्षणाचा फायदा केव्हाही मोठाच आहे, असे ते म्हणायचे. मी एकदा शॉर्टफिल्म बनवली होती. तेव्हा त्यांना आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकदाच वाटले होते. पण, ते मला कायम शिकत राहण्याचा सल्ला देतात.
* सध्या मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल पाहता आपली स्ट्रेंथ काय आहे असे वाटते?
- मला असं वाटतं की, मराठी चित्रपटांचे कथानक ही त्यांची खरी स्ट्रेंथ आहे. मराठी प्रेक्षक आता खूप प्रगल्भ झाले आहेत ते पहिल्यांदा चित्रपटाचे कथानक पाहतात आणि नंतर ते चित्रपटाचे कलाकार कोण आहेत हे बघतात. याचा अर्थ प्रेक्षकांनाही आता चांगल्या कथानकाची आस लागलेली असते. मला असं वाटतं की, उत्कृ ष्ट कथानक हीच आपली स्ट्रेंथ आहे.
* बॉलिवूडचेही दिग्दर्शक आता मराठी चित्रपटांचा रिमेक बनवू इच्छित आहेत. तर काय वाटते एक दिग्दर्शक म्हणून. मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असे म्हणायला हरकत नाही.
- खरंतर काय आहे की, आपल्याक डे चित्रपट रिलीज होतात पण त्यातले काही थोडेच यशस्वी होतात. काही चित्रपटांचे कथानक चांगले असूनही ते बॉक्स आॅफिसवर फारशी चांगली कामगिरी करत नाहीत. त्यामुळे आता चित्रपट रिलीज होण्याचं आणि यशस्वी होण्याचं प्रमाण वाढलंच पाहिजे. बॉलिवूडचे दिग्दर्शक मराठी चित्रपटांचा रिमेक बनवू इच्छित आहेत याचा अर्थ आपल्या मराठी चित्रपटांचं कथानक हे उत्कृष्ट आहे.