गुड बाय 2016 - रंगमंचावरच ‘एक्झिट’

By Admin | Updated: December 29, 2016 02:43 IST2016-12-29T02:43:38+5:302016-12-29T02:43:38+5:30

प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावरच २१ आॅक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले.

Goodbye 2016 - 'Exit' to theater | गुड बाय 2016 - रंगमंचावरच ‘एक्झिट’

गुड बाय 2016 - रंगमंचावरच ‘एक्झिट’

प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावरच २१ आॅक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले. एका कलावंताची अशा पद्धतीने रंगमंचावरच अखेर सर्वांनाच चटका लावून गेली. एकबोटे यांचा ‘नाट्यत्रिविधा’ हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी भरत नाट्यमंदिरात सुरू होता. ८.१५ वाजण्याच्या
सुमारास कार्यक्रमाचे शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी एकबोटे रंगमंचावर आल्या होत्या. हा कार्यक्रम सुरू असतानाच अश्विनी यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्या रंगमंचावर कोसळल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले.

ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन
ध्वनिफितींच्या विश्वावर आपल्या संगीताचे गारुड करणारे ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने निधन झाले. आयुष्यभर संगीतसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या नंदू होनप यांची प्राणज्योत एका कार्यक्रमात संगीतसाधना करतानाच मालवली. रवींद्र नाट्य मंदिरात नंदू होनप यांची गाण्यांची मैफील होती. मैफिलीच्या अंतिम चरणी त्यांनी त्यांचे गाजलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणे वाजवायला घेतले होते आणि या गाण्याचा शेवट होत असतानाच ते कोसळले.

संगीत दाते यांचे निधन
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचा मुलगा संगीत दाते यांचे सायन रुग्णालयात निधन झाले आहे. संपूर्ण संगीतसृष्टीला सुमधुर भावगीतांनी समृद्ध केलेल्या अरुण दाते यांचा मुलगा संगीत पुण्यात कफल्लक अवस्थेत आढळले होते.

सुलभा देशपांडे पडद्याआड
वैचारिकतेची कास केवळ अभिनयापुरती मर्यादित न ठेवता नाट्य-चित्रपट चळवळीच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देणाऱ्या आणि अखेरपर्यंत हाती घेतलेल्या कार्यासाठी झगडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे ३ जून रोजी राहत्या घरी निधन झाले.

एस.एच. रझा यांचे निधन
निसर्गचित्रणापासून सूक्ष्म ‘बिंदू’पर्यंत विलक्षण प्रवास करणाऱ्या सय्यद हैदर रझा यांचे दिल्लीत निधन झाले. आधुनिक कलेला नवे आयाम देणाऱ्या रझा यांनी कला क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले आहे.

अरुण टिकेकर कालवश
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकर यांचे वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. अरुण टिकेकर दीर्घकाळ ‘लोकसत्ता’चे संपादक होते. ‘लोकमत’, ‘सकाळ’ या दैनिकांमध्येही त्यांनी संपादकपद भूषविले होते. टिकेकर यांनी व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास लेखणीबद्ध केला आहे. टिकेकर यांची ओळख एक व्यासंगी व पत्रकारितेची मूल्य जोपासणारा पत्रकार अशीच राहिली. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांचे निधन
प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांचे अंधेरी येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली ५० वर्षे जोगळेकर अंधेरी येथे ‘अर्चना नृत्यालया’मार्फत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देत होत्या.

लेखिका मंगला बर्वे यांचे निधन
पाकशास्त्रावरील ‘अन्नपूर्णा’ या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला
बर्वे यांचे निधन
झाले. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत्या.

रंगकर्मी रेखा सबनीस यांचे निधन
मराठी व हिंदी नाटकांत विविध भूमिका रंगवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस यांचे निधन झाले. रेखा सबनीस यांची ‘रथचक्र’ या नाटकातली भूमिका विशेष गाजली होती. प्रायोगिक रंगभूमीसाठीही त्यांनी योगदान दिले होते.

तुळसी परब यांचे निधन
ज्येष्ठ कवी तुळसी परब यांचे वयाच्या ७५व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. परब यांच्या इच्छेनुसार सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. विद्रोही साहित्य चळवळीत अमूल्य योगदान दिलेल्या परब यांच्या जाण्याने साहित्यविश्वात शोककळा पसरली.

ज्येष्ठ निवेदक भाऊ मराठे
यांचे निधन
प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदक भाऊ मराठे यांचे दादर येथे निधन झाले. खुमासदार निवेदन आणि भारदस्त आवाज ही मराठे यांच्या निवेदनाची वैशिष्ट्ये होती. मराठी साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मराठीतील अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या.

निदा फाजली पडद्याआड
अबालवृद्धांच्या ओठांवर कित्येक दशके गझला रूळवणारे रचनाकार तसेच गीतकार निदा फाजली यांचे मुंबईत निधन झाले. मुक्तिदा हसन निदा फाजली हे निदा फाजली या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या रचना, दोहे, कविता आणि त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे त्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

शेखर नवरे यांचे निधन
अभिनेते शेखर नवरे यांचे दादर येथे निधन झाले. उपचार सुरू असताना एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या.

मुकेश रावल यांचा अपघाती मृत्यू
रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला होता. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला सकाळी रावल यांचा मृतदेह आढळला.

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मराठी साहित्यक्षेत्रात जाधव यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांनी लिहिलेली ‘निळी पहाट’, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’, ‘समीक्षेतील अवतरणे’, ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’, ‘साहित्य व सामाजिक संदर्भ’, ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ आदी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Web Title: Goodbye 2016 - 'Exit' to theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.