बॉलीवूड डायरीज चित्रपट परीक्षण - चित्तवेधक कथा; दुबळे दिग्दर्शन
By Admin | Updated: February 26, 2016 19:35 IST2016-02-26T19:35:33+5:302016-02-26T19:35:33+5:30
स्वत:ला मोठा कलाकार समजणाऱ्यांची आणि रूपेरी दुनियेत एका बडा स्टार म्हणून नाव कमावण्याच्या स्वप्नात रमणाऱ्या लोकांची देशभरात कमतरता नाही.

बॉलीवूड डायरीज चित्रपट परीक्षण - चित्तवेधक कथा; दुबळे दिग्दर्शन
रेटिंग स्टार : २
स्वत:ला मोठा कलाकार समजणाऱ्यांची आणि रूपेरी दुनियेत एका बडा स्टार म्हणून नाव कमावण्याच्या स्वप्नात रमणाऱ्या लोकांची देशभरात कमतरता नाही. अशीच तीन वेगवेगळी पात्रं घेऊन तयार करण्यात आलेला ‘बॉलीवूड डायरीज’ म्हणजे रुपेरी पडद्यामागील दुनियेवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे.
दिल्लीतील एका कॉलसेंटरमध्ये करणाऱ्या रोहितचे (सलीम दिवाण) स्वप्न असते बॉलीवूडचा सुपर स्टार होण्याचे. दुसरा मध्य प्रदेशातील दूर्ग येथील विष्णू (आशिष विद्यार्थी) हा निवृत्तीनंतर बॉलीवूडमध्ये नशीब अजमावू पाहतो, तर कोलकाता येथे वेश्या ईमली (राईमा सेन) अभिनेत्री होण्यासाठी काहीही करण्यास तयार असते. त्यामुळे मुंबईहून आलेला प्रत्येक ग्राहक तिला महत्त्वाचा वाटतो. दिल्लीच्या रोहितला चित्रपटात कोणतीही संधी मिळत नाही;
परंतु, टीव्हीवरील एका ’टॅलेन्ट शो’मध्ये तो तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी होतो. त्याला पुन्हा बॉलीवूडचे स्वप्न पडू लागतात. तिसऱ्या फेरीपर्यंत तो एखाद्या स्टारप्रमाणे लोकप्रिय होतो; परंतु, तिसऱ्या फेरीनंतरच्या वास्तवामुळे त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतोआणितो मानसिक संतुलन गमावून बसतो. दुसरीकडे ६२ वर्षीय विष्णू बॉलिवूडमध्ये जाण्याच्या जिद्दीने पत्नीशी भांडतो. तथापि, कॅन्सर असल्याचे त्याला कळल्याने त्याच्या सर्व इच्छांवर पाणी फेरले जाते. पुढच्या जन्मात एखाद्या स्टारच्या कुटुंबात जन्म घेऊन बॉलीवूडमध्ये झळकण्याची तो मनोमन इच्छा बाळगतो. ईमलीला बॉलीवूडचा एक डायरेक्टर दीमन (विनितकुमार सिंह) भेटतो. त्याला एक वास्तवादी चित्रपट करायचा असतो. ईमलीवर बेतलेली आपबीती त्यालाचित्रपटाची कथा वाटते. तो ईमलीला हिरोईन करून चित्रपट करण्यास तयार होतो. ईमलीलाही स्वप्न साकार होणार असल्याचे वाटू लागतो. परंतु, मुंबईला परतल्यानंतर दिमनने अन्य हिरोईनला घेऊन चित्रपट बनविण्याची घोषणा केल्यानंतर ईमली कमालीची हताश होते आणि दुबईला जाऊन बारगर्ल होण्याचे ठरविते.
उणीवा : दिग्दर्शक के. डी. सत्यम यांच्याकडे चित्तवेधी कथानक असतांना चांगला चित्रपट देण्याची संधी त्यांनी गमावली. तीन वेगवेगळ्या पात्रांची व्यथा आणि कथा यांची सांगड घालण्याचे कसब त्यांना जमले नाही. त्यामुळे त्यांचे प्रयत्न भरकटत गेले. ईमली आणि रोहितच्या तुलनेत विष्णूचे पात्र दुबळे असताना दिग्दर्शकाचा सर्वाधिक भर विष्णूवरच राहिला. परिणामी बनावटीपणामुळे वास्तविकपणाकडे दुर्लक्ष झाले. रोहितच्या भूमिकेत सलीम दीमन फिक्का पडला. राईमा सेनने ईमलीची भूमिका सादर करताना चांगला भावनात्मक अभियन सादर करण्याचा प्रयत्न केला.
आशिष विद्यार्थीचा अभिनय चांगला आहे; परंतु,कथानकातील हे अत्यंत दुबळे पात्र ठरले. वैशिष्ट्ये : रोहित आणि ईमलीची कथा युवा दर्शकांना भावेल. कोलकाता ते दिल्लीपर्यंतचे चित्रीकरण चांगले झाले आहे. संगीतही चांगले आहे. का पाहवा... बॉलीवूडचे स्वप्न पाहणाऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजून घेता येतील. का पाहू नये... कथेतील असमतोल आणि दुबळेपण निराश करणारे आहे. तथापि, एकदा का होईना पाहवा, असे या चित्रपटातखूप काही आहे.