भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवून देताना दिसत आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ५६ चेंडूंमध्ये स्फोटक शतकी खेळीसह पुन्हा एकदा BCCI निवडकर्त्यांना आपल्या फलंदाजीतील चमक दाखवून दिली आहे. नव्या वर्षात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघ निवडीच्या तोंडावर सरफराज खानने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक अर्धशतक आणि एक शतकासह सोडली खास छाप
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामात सरफराज खान याने मुंबईच्या संघाकडून खेळताना आतापर्यंत एक अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. मुंबईच्या चार सामन्यांपैकी एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. ज्या सामन्यात रोहित शर्मानं १५५ धावांची खेळी केली त्या सामन्यात तो ८ धावांवर नाबाद राहिली होता. याउलट ज्या सामन्यात रोहित शर्मा खाते उघडू शकला नाही त्या सामन्यात सरफराज खान याने ५५ धावांची उपयुक्त खेळी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
Flashback 2025 : ऑस्ट्रेलियाच्या बेस्ट टेस्ट XI मध्ये ३ भारतीय! जड्डूला मात्र ‘वॉटरबॉय’ बनवलं
२३ चेंडूत अर्धशतक, ५६ चेंडूत शतकाला गवसणी अन्...
जयपूरच्या जयपूरिया विद्यालय मैदानावर रंगलेल्या सामन्यात गोवा संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल ६४ चेंडूंत ४६ धावा केल्या. अंगकृष रघुवंशी ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर सरफराज खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान जोडी पुन्हा जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली. सरफराजने २३ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. दुसऱ्या बाजूला मुशीर खान याने ६६ चेंडूत ५ चौकारासह २ षटकाराच्या मदतीने ६० धावांचे योगदान दिले. मुशीर बाद झाल्यावर सरफराज खान याने ५६ चेंडूत शतक साजरे केले. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले. या सामन्यात त्याला द्विशतकी खेळी करण्याची मोठी संधी होती. पण १५७ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. त्याने ७५ चेंडूत ९ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने २०९.३३ च्या स्ट्राईक रेटसह या धावा केल्या.