विराट कोहली-रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप का खेळायला हवा? जाणून घ्या ५ कारणं

Virat Kohli- Rohit Sharma T20 World Cup 2024 - भारतीय संघाचे स्टार सीनियर्स विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळावा की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही खेळाडू ट्वेटी-२० फॉरमॅट पासून बरेच दिवस दूर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठीच्या मालिकेतही ते खेळत नाहीत. ही दोघं थेट आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहेत.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बीसीसीआय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत ३ ते ३० जून याकालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणार आहे. रोहित ३६ वर्षांचा आणि विराट ३५ वर्षांचा आहे. ही दोघंही १० नोव्हेंबर २०२२ मध्ये शेवटची ट्वेंटी-२० मॅच खेळले होते.

विराट कोहलीने ११५ ट्वेंटी-२० सामन्यांत ५२.७३ च्या सरासरीने ४००८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. रोहितने १४८ ट्वेंटी-२०त ३१.३२च्या सरासरीने ३८५३ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी ही दोघंही महत्त्वाची आहेत.

विराट कोहलीने २०२३ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील ११ वन डे सामन्यांत ७६५ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये ५० शतकं करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितनेही याच वर्ल्ड कप स्पर्धेत ११ सामन्यांत ५४.२७ च्या सरासरीने ५९७ धावा केल्या आहेत. हेही एक कारण टीम इंडियात असण्यासाठी पुरेसे आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने आक्रमक सुरुवात करून देताना अन्य फलंदाजांचा भार हलका केला. त्याने वर्ल्ड कपमध्ये पॉपरप्लेमध्ये ४०१ धावा चोपल्या आणि त्यात ४६ चौकारा व २४ षटकारांचा समावेश आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशाच स्फोटक सुरुवातीची भारताला गरज आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सर्वाधिक १० सामने जिंकले आणि रोहितच्या कर्णधार म्हणून सर्व रणनीती यशस्वी ठरल्या. उपांत्य फेरीत २९व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर केन विलियम्सनचा झेल बुमराहने टाकला. पण, त्यानंतर रोहितने शमीला गोलंदाजीला आणले आणि ही विकेट मिळाली.

ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघासाठी ओपनर्स महत्त्वाचे असतात. रोहित हा २०२० नंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक ११३९ धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ४१ सामन्यांत या धावा करताना ९ अर्धशतकं झळकावली आहेत