भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या IPL गाजवतोय. त्याने १२ सामन्यांमध्ये ५३.७७ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. कोहलीचा संघही उत्कृष्ट कामगिरी करत असून १६ गुणांसह ते प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
आयपीएल दरम्यान, विराट कोहलीने एक विशेष मुलाखत दिली, ज्यात तो २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलला. कोहलीने सांगितले की त्याला २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायचे आहे, पण त्याची एक स्पष्ट अट आहे की, त्याला स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज वाटू नये.
विराट कोहली आरसीबीच्या एका पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'जर मला माझी योग्यता प्रत्येक वेळी सिद्ध करावी लागत असेल तर मात्र मला ते आवडणार नाही. कारण मी माझ्या क्रिकेटमधील तयारीबद्दल आणि मेहनतीबद्दल पूर्णपणे प्रामाणिक आहे. मी त्यात कुठलीही कसूर किंवा आळस करत नाही. '
'जर संघाने मला ४० षटके मैदानावर धावायला सांगितले, तर मी तक्रार करणार नाही. मी प्रत्येक चेंडू असा खेळतो, जणू तो माझ्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू आहे. आता मी कोणत्याही टीकेसाठी किंवा विक्रमांसाठी खेळत नाही, केवळ खेळावरील प्रेमापोटी मैदानात उतरतो आणि खेळाचा आनंद घेतो.'
'जेव्हा मी विश्रांतीनंतर पुन्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात हे स्पष्ट होते की मला कोणालाही काहीही सिद्ध करायचे नाही. मी क्रिकेट खेळतो, कारण माझे क्रिकेटवर प्रेम आहे. जेव्हा मी दबाव घेणे कमी केले, तेव्हापासून मला पुन्हा क्रिकेट खेळताना लहान मुलासारखा आनंद अनुभवता येऊ लागला.'
'मी मैदानावर उड्या मारत होतो, पूर्ण उत्साहाने क्षेत्ररक्षण करत होतो. मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले. हे सारे इतर कोणासाठी नाही, तर क्रिकेटवरील माझ्या प्रेमासाठी आहे. जर एखाद्या खेळाडूवर विश्वास असेल, तर प्रत्येक खराब कामगिरीनंतर त्याचे मूल्यांकन बदलणे योग्य नाही.'
'एकतर पहिल्याच दिवशी स्पष्टपणे सांगा की मी महत्त्वाचा नाही, किंवा माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक सामन्यानंतर आपले मत बदलल्याने स्थिर वातावरण निर्माण होत नाही. जर मी खेळत राहिलो, तर साहजिकच मला भारतासाठी विश्वचषक खेळायचा आहे,' असेही विराट म्हणाला.