न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. सर्वोत्तम फलंदाजांचा संघ अशी ओळख असणाऱ्या भारताच्या नावे आज ५ लाजिरवाणे विक्रम झाले.
भारतीय संघाने आज मायदेशातील कसोटीत सर्वात कमी धावसंख्या करण्याचा वाईट रेकॉर्ड केला. याआधी विंडिजविरूद्ध दिल्लीत १९८७ साली ७५ धावांवर ऑलआऊट ही भारताची सर्वात कमी धावसंख्या होती.
मायदेशात खेळताना भारतीय संघाच्या 'टॉप ७' फलंदाजांपैकी आज सर्वाधिक ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. याआधी दोन वेळा टॉप ७ पैकी जास्तीत जास्त ४ फलंदाज शून्यावर बाद झाले होते.
भारताच्या Top 4 फलंदाजांनी मायदेशात खेळताना सर्वात कमी धावा करण्याच्या यादीत ही आजची धावसंख्या तिसऱ्या स्थानी आहे. आज भारताच्या Top 4 फलंदाजांनी एकूण १५ धावा केल्या. त्याआधी डिसेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरूद्ध भारताच्या Top 4ने १० धावा तर नोव्हेंबर २०१० मध्ये Top 4ने १४ धावा केल्या होत्या.
भारतीय भूमीवर खेळताना टीम इंडियाच्या Top 6 फलंदाजांनी केलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. १९६९ मध्ये हैदराबाद कसोटीत भारताचे ६ बळी २७ धावांतच बाद झाले होते. बंगळुरू कसोटीत भारताने ३४ धावांवर सहावा गडी गमावला.
भारतीय संघाची आजची कामगिरी ही आशिया खंडातील सर्वात कमी धावसंख्या ठरली. १९८६ साली पाकिस्तान विरूद्ध विंडिजच्या संघाचा ५३ धावांवर ऑलआऊट झाला होता.