आज आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.
यंदाच्या हंगामात पावसाने लवकर हजेरी लावल्याने काही सामने रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानुसार दोन्ही संघांचे साखळी फेरीतील १-१ सामने पावसाने वाया घालवले. त्यावेळी दोन्ही संघांना १-१ गुण दिला गेला होता.
पण अंतिम सामन्यासाठी मात्र बीसीसीआयने काही महत्त्वपूर्ण नियम तयार केले आहेत. २२ मे रोजी सामील करून घेतलेल्या नव्या नियमावलीनुसार, स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यासाठी राखीव दिवसाचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
फायनलचा निकाल नियमित सामन्यात लागेल आणि IPL ला आजच नवा चॅम्पियन मिळेल अशी प्रत्येक क्रिकेटचाहत्याची इच्छा आहे. पण सामना काही कारणाने होऊच शकला नाही तर विजेता कोण असेल, यासाठी तीन नियम ठरवण्यात आलेत.
सर्वात आधी, जर सामना नेहमीप्रमाणे सुरू झाला आणि नियमित वेळ संपल्यानंतर सामना बरोबरीत सुटला असेल, तर अशा वेळी हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल आणि सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील.
दुसरा नियम म्हणजे सामन्याची सुरुवात उशिरा झाल्यास आजच्या दिवसात १२० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी ठेवण्यात आला आहेत. तसेच, आज काही कारणास्तव सामन्याचा निकाल लागला नाही तर उद्याचा राखीव दिवशी सामना खेळला जाईल.
तिसरा नियम म्हणजे, जर ३ आणि ४ जून या दोन्ही दिवशी अहमदाबादमध्ये पाऊस पडला किंवा इतर कुठल्याही कारणाने सामन्याचा निकाल लागूच शकला नाही तर नियमानुसार, लीग स्टेजवरून निकाल लावला जाईल.
याचाच अर्थ, जर पावसामुळे किंवा कुठल्याही कारणाने सामन्याचा मैदानात निकाल लागला नाही तर पंजाब किंग्जला विजेते घोषित केले जाईल. कारण प्लेऑफमध्ये जरी RCB ने पंजाबला हरवले असले फायनलचा निकाल हा साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलवरून लावला जाईल.