आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) क्रिकेटमधील काही नियमांमध्ये व्यापक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना क्रिकेट नव्या रूपात खेळलं जाताना दिसणार आहे. आयसीसीने संघातील अंतिम ११ खेळाडूंबाबतच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, हे बदल कसोटी सामन्यांमध्ये जून महिन्यापासून आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जुलै महिन्यापासून लागू होणार आहेत.
यातील प्रमुख बदल हे मुख्यत्वेकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार आहेत. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. मात्र आता नव्या नियमानुसार एका डावामधील पहिल्या ३४ षटकांपर्यंत दोन्ही चेंडू वापरले जातील. तर ३५ व्या षटकापासून पुढे डावाच्या अखेरीपर्यंत एकच चेंडू दोन्ही बाजूंनी वापरला जाईल.