"पाकिस्तान जेव्हा भारतात क्रिकेट खेळतो तेव्हा भारतीय मुस्लीम..."- पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

India vs Pakistan: पाक माजी खेळाडूच्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान मधील राजकीय संबंध खूपच खराब आहेत. त्यामुळे खेळावर आणि विशेषतः क्रिकेटवर याचा परिणाम होताना दिसतो. याच कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांदरम्यान कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.

आगामी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत, मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने केलेल्या विधानाची चर्चा आहे. त्याच्या विधानावरून चांगलीच खडाजंगी होणार असल्याचेही दिसत आहे.

आशिया चषकात भारताचा संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यावेळी यानंतर आयसीसी वनडे विश्वचषक भारत यजमान असताना भारतात विश्वचषकाचा भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. तशातच पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद उल हसनने भारत - पाक सामन्याच्या आधीच बरळण्यास सुरूवात केली आहे. भारतात विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत, पण असे असले तरी पाकिस्तानच्या संघालाच पाठिंबा मिळेल असं त्याने म्हटले आहेत.

राणा नावेद म्हणाला, "जेव्हा भारतात क्रिकेटचा सामना असतो त्या प्रत्येक वेळी टीम इंडियाच सर्वांची फेव्हरिट असते आणि भारत जिंकावा असंच तिथल्या सर्व क्रिकेटप्रेमींना वाटत असतं."

"पण ज्यावेळी पाकिस्तानचा संघ भारतात जाऊन क्रिकेट खेळतो, त्यावेळी मात्र भारतातील मुस्लीम लोक टीम इंडियाच्या ऐवजी पाकिस्तानच्या संघालाच पाठिंबा देतात," असे म्हणत राणा नावेदने एक नवा वाद उपस्थित केला आहे.

दरम्यान, यावर राणा नावेदला सोशल मीडियावरच चोख प्रत्युत्तर मिळू लागले आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राणा नावेद २०१० साली पाकिस्तानकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला.