"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ

क्रिकेट जगतात कुणाला नाही जमलं ते मुंबई इंडियन्सने करून दाखवलं.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध चांगली सुरुवात मिळाल्यावर अखेरच्या १० षटकात MI च्या ताफ्यातील फलंदाज धावगती वाढवण्यात असमर्थ ठरले.

मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पांड्याचा हा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही.

नमन धीरच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात MI नं निर्धारित २० षटकांत मुंबई ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने अगदी एकतर्फी बाजी मारली. ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी ८ विकेट्स राखून विजयम मिळवला.

दुसरीकडे या पराभवासह मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. पण तुम्हाला माहितीये का? या संघर्षाच्या काळातही "दुनिया हिला देंगे हम!" तोऱ्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने नवा इतिहास रचत टी-२० विश्वात अद्वितीय पराक्रम करून दाखवला आहे.

चेपॉकच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघाने टी-२० क्रिकेटमध्ये ५० हजार धावांचा पल्ला पार केला.

अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा क्रिकेट जगतातील पहिला संघ आहे. २८६ सामन्यात पाच वेळच्या IPL चॅम्पियन संघाने टी-२० क्रिकेटमध्ये ५० हजार धावांसह अद्वितीय पराक्रम करून दाखवला आहे.

या यादीत इंग्लिश काउंटी क्लबमधील सॉमरसेट संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ३०३ टी-२० सामन्यात आतापर्यंत ४८,२४४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. RCB च्या संघाने आतापर्यंत २९५ सामन्यात ४७,३०४ धावा केल्या आहेत.