पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाची गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यामुळे यावेळी संघाची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. तसेच संघाची वरच्या फळीतील फलंदाजी भक्कम करण्यावर संघ व्यवस्थापनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे. या दरम्यान, चेन्नईकडून डावाची सुरुवात कोण करणार याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता याबाबत कर्णधार ऋतुराज गायकवाड याने महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून मी स्वत: सलामीसाठी फलंदाजीला येणार आहे. तसेच माझ्यासोबत संजू सॅमसन चेन्नईच्या डावाची सुरुवात करेल, असे ऋतुराज गायकवाडने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ गेल्या हंगामाप्रमाणे यावेळी चेन्नईचा संघ सलामीवीरांबाबत कुठलेही प्रयोग करणार नाही हे, स्पष्ट झाले आहे.
गेल्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ससाठी आघाडीची फळी ही मोठी डोकेदुखी ठरली होती. तसेच ऋतुराज गायकवाडला अनेक सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती. तर सलामीसाठी रचिन रवींद्र, डेवॉन कॉन्वे आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंना पडताळून पाहण्यात आले होते. मात्र यातील एकही प्रयोग यशस्वी ठरला नव्हता.
गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे स्पर्धेच्या मध्यावरूनच संघाबाहेर जावे लागले होते. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना संधी मिळाली. त्यात आयुष म्हात्रे याने ७ डावांमध्ये २४० धावा बनवल्या. तर ब्रेव्हिसने ६ डावात २२५ धावा काढून फिनिशरची भूमिका उत्तमपणे वठवली होती.
मात्र असं असलं तरी चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने संघात एक अनुभवी सलामीवीर असा विचार करून संजू सॅमसन याला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करून आपल्या संघात घेतले. तर त्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करण यांना पाठवले.
पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपरकिंग्सची ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीच्या पोझिशनबाबत संभ्रम कायम आहे. तसेच याचं उत्तर मिळवण्यासाठी चाहत्यांना आयपीएलच्या पहिल्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असे ऋतुराज गायकवाडने सांगितले.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अभियानाची सुरुवात ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी येथे होणाऱ्या लढतीने होणार आहे.