दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने लढत दिली, पण शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उत्तम खेळ करत सामना जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने २-०ने मालिकेत आघाडी घेतली.
रोहित शर्मा (७३) आणि श्रेयस अय्यर (६१) च्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला २६५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात मॅथ्यू शॉर्ट (७४) आणि कूपर कोनॉली (नाबाद ६१) यांनी ऑस्ट्रेलिया विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा नवखा वनडे कर्णधार शुबमन गिलची ही पहिलीच वनडे मालिका होती. या मालिकेत त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यावर गिलने रोखठोक मत मांडले.
शुबमन गिल म्हणाला, 'मला असं वाटतं की आमच्या फलंदाजांनी पुरेशा धावा स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या. पण जेव्हा तुमच्या संघाकडून एक-दोन झेल सुटतात तेव्हा कुठलाही स्कोअर कमीच वाटतो.'
'चेंडू जसा जुना झाला तशी खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त फायदेशीर ठरताना दिसली. आजही मी टॉस हारलो, पण पहिल्या सामन्यात पावसामुळे टॉसला जितके महत्त्व होते, तेवढे महत्त्व आज नव्हते.'
'दोनही संघांनी जवळपास पूर्ण ५० षटके खेळली. आमच्या डावाच्या वेळी पहिल्या १०-१५ षटकांमध्ये खेळपट्टी सेट झाली. पण रोहित शर्माचे विशेष कौतुक करावे लागेल. त्याने उत्तम खेळ खेळला.'
'रोहितने सुरुवातीच्या षटकांमध्ये खूप संयम दाखवला आणि नंतर खेळपट्टीवर नजर स्थिरावल्यावर फटकेबाजी केली. तो पुन्हा फॉर्ममध्ये परतला. त्यामुळे त्याची खेळी आमच्यासाठी महत्त्वाची आहे,' असेही तो म्हणाला.