भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पिछाडी भरून काढण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-२ अशा पिछाडीवर आहे.
जर इंग्लंडच्या संघाने हा सामना जिंकला, किंवा सामना अनिर्णित राखला तर टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरेच राहिल.
इंग्लंडची बरोबरी साधत मालिका जिंकण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मँचेस्टरच्या मैदानात आतापर्यंत जे कधीचं साध्य झालं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज असेल.
इथं एक नजर टाकुयात या मैदानातील कसोटी सामन्यात कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती
इंग्लंडमधील मँचेस्टरच्या मैदानात भारतीय संघाने १९३६ मध्ये पहिला तर २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. ८९ वर्षांच्या इतिहासात ९ वेळा भारत-इंग्लंड दोन्ही संघ या मैदानात समोरा-समोर आले. पण एकदाही टीम इंडियाला इथं विजय मिळवता आलेला नाही.
१९३६, १९४६, १९७१, १९८२ आणि १९९० च्या दौऱ्यात भारतीय संघाने या मैदानात आतापर्यंत ५ कसोटी सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. १९५२, १९५९, १९७४ आणि २०१४ या दौऱ्यात भारतीय संघाला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.