आशिया चषकात तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. पावसामुळं हा सामना अनिर्णित राहिला. पाकिस्तानी संघाला एकही चेंडू खेळता आला नाही. तर, भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २६७ धावांचे लक्ष्य दिले होते.
पाऊस आल्यानंतर बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान अनेक भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांमध्ये मिसळताना दिसले.
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची गळाभेट भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरला खटकली. मैत्री मैदानाबाहेर असायला हवी असे गंभीरने म्हटले.
गौतम गंभीर समालोचन करत होता. त्याने सांगितले की, जेव्हा तुम्ही मैदानावर राष्ट्रीय संघासाठी खेळता तेव्हा तुम्हाला मैत्रीची मर्यादा ओलांडून ठेवावी लागते. खेळाचा भाग असणे महत्त्वाचे आहे.
'मैत्री मैदानाबाहेर असली पाहिजे. सात तासांच्या क्रिकेट सामन्यानंतर तुम्ही मैत्रीपूर्ण होऊ शकता. कारण सामना सुरू असताना तुम्ही करोडो लोकांचे प्रतिनिधित्व करत असता', असे गंभीरने म्हटले.
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलचे उदाहरण देताना गौतम गंभीर म्हणाला, 'मी आणि कामरान अकमल खूप चांगले मित्र आहोत. कामरानने मला बॅट दिली होती. मी देखील त्याला बॅट दिली. मी संपूर्ण हंगामात त्याने दिलेल्या बॅटने खेळलो आहे. आम्ही नुकतेच अर्धा तास बोललो. तुम्ही मैदानावर एका खेळाडूला स्लेज केले तर त्यात चुकीचे काही नाही. पण मैदानात ही मैत्री आणू नये.'
भारतीय संघाचा आगामी सामना नेपाळशी आहे, जिथे जिंकल्यानंतर टीम इंडिया सुपर-४ मध्ये पोहोचेल. पाकिस्तानने आधीच पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
पाकिस्तानचे तीन तर भारताचा एक गुण आहे. भारताने नेपाळला हरवल्यास ते सुपर ४ मध्ये पोहोचतील. लक्षणीय बाब म्हणजे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच सावध खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीने सतावले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवून आपला इरादा स्पष्ट केला.
त्यापाठोपाठ हारिस रौफने सलामीवीर शुबमन गिलला बाद केले. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. अखेर भारताला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् टीम इंडिया ४८.५ षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाली.