भारतीय कर्णधारांमध्ये रस्सीखेच! हरमनप्रीतच्या 'विराट' खेळीने रोहितचा मोठा विक्रम मोडीत

harmanpreet kaur records : भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर यजमान बांगलादेशला पराभवाची धूळ चारली.

तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने मॅचविनिंग खेळी केली. तिने नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर यजमान बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. आपल्या अर्धशतकी खेळीमुळे कर्णधार हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह हरमनने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे यजमान संघ २० षटकांत ५ बाद केवळ ११४ धावा करू शकला. ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सहज लक्ष्य गाठले.

११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला शेफाली वर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. पण कर्णधार हरमनप्रीत कौर नाबाद (५४) आणि उप कर्णधार स्मृती मानधना (३८) यांनी डाव सावरला आणि विजयी सलामी दिली.

भारतीय संघाने १६.२ षटकांत ३ बाद ११८ धावा करून २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. कर्णधार हरमनने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ चेंडूत ५४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. आपल्या अप्रतिम अर्धशतकी खेळीमुळे कर्णधार हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हा सामनावीर पुरस्कार जिंकताच हरमनने भारताच्या पुरूष संघाचा कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये कर्णधार तिने पाचव्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब जिंकला. यासह तिने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहितने कर्णधार म्हणून चारवेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे.

ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक वेळा 'सामनावीर' पुरस्कार जिंकणारे भारतीय कर्णधार - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

हरमनप्रीत कौर - ६, रोहित शर्मा - ५, विराट कोहली - ३ आणि मिताली राज - २.

कर्णधार हरमनप्रीत कौर भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळली आहे. तिने ३ कसोटी सामन्यांमध्ये ३८, १२४ वन डे सामन्यांमध्ये ३३२२ आणि १५२ ट्वेंटी-२० मध्ये ३११२ धावा केल्या आहेत. एक स्फोटक फलंदाज म्हणून तिची ख्याती आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने उभारी घेतली. याशिवाय विविध मोठ्या स्पर्धांमध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली. मागील वर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले.

खरं तर भल्याभल्या संघांना चीतपट करणाऱ्या भारतीय संघाला दोनवेळा मोठ्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलियन संघाने पराभूत केले. अलीकडेच पार पडलेल्या विश्वचषकात देखील भारताला ऑस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.