या क्रमवारीत पहिले नाव आहे ते लाला अमनाथ यांचे. लाला अमरनाथ यांनी आपल्या पदार्पणातील सामन्यातच ११८ धावांची खेळी केली होती. मात्र त्यानंतर खेळलेल्या २३ सामन्यात त्यांना एकही शतक फटकावता आले नाही. त्यामुळे त्यांचे पहिलेच कसोटी शतक शेवटचे ठरले. विशेष बाब म्हणजे लाला अमरनाथ यांचे हे पहिले शतक भारतीय कसोटी क्रिकेटमधीलसुद्धा पहिले शतक ठरले होते.
१९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दीपक शोधन यांनी पदार्पणातच शतक ठोकले होते, हेच त्यांचे शेवटचे शतक ठरले. त्यांची कारकीर्द अल्पकालीन ठरली. त्यांनी कारकिर्दीत केवळ तीन कसोटी सामने खेळले. ए
ए. जी. कृपाल सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १४ कसोटी सामने खेळले. पैकी १९५५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे खेळलेल्या पहिल्याच कसोटीत त्यांनी नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा तीन आकडी धावा कधी फटकावत आल्या नाहीत. मात्र त्यांनी दोन अर्धशतकी खेळी केल्या.
अब्बास अली बेग यांनी १९५९ मध्ये मँचेस्टर कसोटीत इंग्लंडविरुद्ध ११२ धावांची खेळी केली होती. त्यांनी नंतर १० कसोटी सामने खेळले. मात्र त्यांना पुन्हा शतक फटकावता आले नाही. यादरम्यान त्यांनी दोन अर्धशतके मात्र फटकावली.
हनुमंत सिंह यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण १४ कसोटी सामने खेळले. त्यांनी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या दिल्ली कसोटीतून पदार्पण केले. त्यांनी या कसोटीत १०५ धावांची खेळी केली होती. हे शतक त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील पहिले आणि शेवटचे शतक ठरले होते.
१९७६ मध्ये झालेल्या अॉकलंड कसोटीत सुरेंदर अमरनाथ यांनी पदार्पण करताना १२४ धावांची खेळी केली. मात्र या खेळीनंतर सुरेंदर अमरनाथ यांची कारकीर्द फार बहरली नाही. त्यांनी एकूण दहा कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी एक शतक आणि तीन अर्धशतके फटकावली.
प्रवीण आमरे यांनी आपला पहिला कसोटी सामना १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला. या सामन्यात त्यांनी १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र त्यांना कसोटीत शतक फटकवता आले नाही.
अलीकडच्या काळात सुरेश रैनाने २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कोलंबो कसोटीमधून पदार्पण करताना रैनाने १२० धावांची खेळी केली. याच सामन्यात सचिन तेंडुलकरने द्विशतक फटकावले होते. मात्र त्यानंतर सुरेश रैनाला कसोटी संघात फारशी संधी मिळाली नाही. त्याने अद्याप निवृत्ती स्वीकारलेली नाही. मात्र त्याचे कसोटी संघात पुनरागमन होणे आता कठीण बाब बनलेले आहे.