मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. प्राण्यांशी क्रूरपणे वागणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती त्याने पत्राद्वारे केली आहे.
प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या PETA या संस्थेने ही माहिती समोर आणली आहे. चहलने त्याच्या पत्रात प्राण्यांसाठी असलेले कलम १९६० याचा उल्लेख केला आहे. या कलमानुसार प्रथम दोषी व्यक्तीला ५० रुपये दंडाची शिक्षा आहे आणि ही शिक्षा कालबाह्य झालेली असल्याचे चहलने नमूद केले आहे, अशी माहिती PETAने दिली.
चहलने लिहिले की,' दुर्दैवाने देशात गाई, श्वान आणि अन्य प्राण्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. त्यांना मारहाण केली जाते, विष दिले जात आहे, त्यांच्यावर ॲसिड हल्लाही होतो आणि लैंगिक शोषणही होते. अशा क्रूर व्यक्तींना कारावास व्हायला हवा.'
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी PETA च्या मोहिमेत सहभाग घेतला आहे आणि त्यात चहलही सहभागी झाला आहे.