World Championship of Legends 2025 IND vs PAK : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित क्रिकेट सामना रद्द करण्याची वेळ आली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला अन् त्यानंतर भारत-पाक यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा दाखला देत भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातवर बहिष्कार टाकला. २० जुलै रोजीचा भारत-पाक सामना रद्द झाल्याचा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. या प्रकरणात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया आली आहे. त्याने भारताचा स्टार अन् लोकप्रिय क्रिकेटर शिखर धवन याच्यावर शाब्दिक हल्ला केल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा
शाहिद आफ्रिदी याने भारत-पाक यांच्यातील सामना रद्द झाल्यावर आपलं मत व्यक्त करताना एक मोठा दावा केला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूही निराश आहेत. फक्त एका खेळाडूमुळे दिग्गज टी-२० लीगमधील भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रद्द झाला, असा दावा शाहिद आफ्रिदीनं केला आहे.
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
या भारतीय क्रिकेटरनं सहकाऱ्यांना भडकले Geosuper.tv च्या वृत्तानुसार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाहीद आफ्रिदी म्हणाला की, भारतीय क्रिकेटरही हा सामना रद्द झाल्यामुळे निराश आहेत. नियोजित सामना रद्द होण्यामागे फक्त एक खेळाडू आहे, असे सांगताना त्याने शिखर धवनचे नाव घेतले. सामन्याआधी गब्बरनं सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडली होती. त्याने भारतीय क्रिकेटर्सच्या मनात पाकिस्तानविरुद्ध विष कालवले, अशा आशयाचे वक्तव्य शाहिद आफ्रिदीनं केले आहे.
नेमकं काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
खेळ हे दोन देशांतील संबंध सुधारण्याचं एक उत्तम माध्यम आहे. जर प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले तर आपण पुढे कसे जाणार? चर्चेशिवाय कोणतेही प्रश्न सुटत नसतात. या सामन्याच्या माध्यमातून एकमेकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्नही आयोजकांकडून केला जातोय. पण काही लोकांना हे नकोय, असे म्हणत त्याने शिखर धवनवर निशाणा साधला आहे.
शिखर धवनला सल्ला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या भारत-पाकिस्तानच्या संघामध्ये WCL 2025 स्पर्धेतील सामना रंगणार होता. या सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडूंनी सरावही केला. पण एकामुळे सगळं प्लॅनिंग बिघडले, असे म्हणत शिखर धवन याने दोन्ही देशांतील एक उत्तम राजदूत होण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं दिला आहे.