अनेक वादविवाद आणि पडद्याआड घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी होणाऱ्या लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या या लढतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. पण नंतर यूटर्न घेत पाकिस्तानचा संघ या लढतीत खेळण्यास तयार झाला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लढतीत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. मात्र आता टी-२० वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या या लढतीत भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या लढतीत खेळण्यासाठी पाकिस्तानने अनेक अटी घातल्या होत्या. त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करावं, ही सुद्धा एक अट होती. गतवर्षी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. त्यामुळे हा मुद्दा पाकिस्तानने प्रतिष्ठेचा बनवलं आहे.
मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यासाठी सामन्यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करावं, अशी अट घातली असली. तरी भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाहीत. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या लढतीत अखेरच्या क्षणी काही मोठे फेरबदल झाले नाहीत तर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन होण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. तसेच आयसीसीनेही पाकिस्तानची ही अट मान्य करण्यास नकार दिला होता.