Ishan Kishan On Kirti Azad Statement : भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव, कोच गौतम गंभीर आणि ICC अध्यक्ष जय शाह ट्रॉफी घेऊन थेट हनुमान मंदिरात गेल्याचे पाहायला मिळाले होते. या मुद्यावरुन १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचे सदस्य कीर्ती आझाद यांनी टीका केली आहे. सूर्या-गंभीरसह ICC अध्यक्ष जय शहा यांच्यावर निशाणा साधताना ते जे बोलले तो मुद्दा गाजत असताना त्यांच्या वक्तव्यावरील प्रश्न विचारल्यावर ईशान किशनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कीर्ती आझादांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर काय म्हणाला ईशान किशन?
मंगळवारी पटना येथे पत्रकारांशी बोलताना ईशान किशन म्हणाला की, "संघ जिंकला आहे, ही केवळ आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी चांगली गोष्ट आहे. आम्ही पुढेही चांगले क्रिकेट खेळू आणि जिंकत राहू, अशी अपेक्षा आहे." यावेळी ईशान किशनला माजी दिग्गज क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन कीर्ती आझाद यांनी ट्रॉफी मंदिरात नेल्यावर केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर ईशान किशन म्हणाला की, "इतकी मोठी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलो आहोत. चांगले प्रश्न विचारा. कीर्ती आझाद काय बोलले, यावर मी काय बोलू?." ईशान किशन याने काही न बोलता माजी चॅम्पियनच्या वक्तव्याला अर्थ नाही, असेच सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)
कीर्ती आझाद यांना कोणती गोष्ट खटकली?
कीर्ती आझाद एक्स अकाउंटवरुन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघावर टीका केली होती. “टीम इंडियाची लाज वाटते. जेव्हा आम्ही १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकलो, तेव्हा आमच्या संघात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन खेळाडू होते. आम्ही ट्रॉफी आपल्या धार्मिक जन्मभूमीत नाही, तर आपल्या मातृभूमी भारतात आणली होती. भारतीय क्रिकेट ट्रॉफीला धार्मिक स्थळी का नेले जात आहे? मशिद, चर्च गुरुद्वारा येथे का नाही? ही टीम भारताचे प्रतिनिधित्व करते, सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचे नाही. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी मोहम्मद सिराज आणि संजू सॅमसनचा उल्लेख करत ही ट्रॉफी १४० कोटी भारतीयांची आहे, कोणत्याही एका धर्माची नाही."
ईशान किशन याने शानदार कामगिरीसह गाजवली स्पर्धा
जवळपास २ वर्षांनी संघात संधी मिळालेल्या ईशान किशन याने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ९ सामन्यांत ३५.२२ च्या सरासरीने १९३.२९ च्या स्ट्राइक रेटने ३१७ धावा केल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय संघाला विक्रमी जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फायनलमध्ये त्याच्या भात्यातून स्फोटक अर्धशतक पाहायला मिळाले होते.