पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली संघाचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबची हिट सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी लवकर पॅव्हेलियनचा रस्ता धरल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. पण कर्णधार श्रेयस अय्यरनं आपल्या सातत्यपूर्ण खेळीचा आणखी एक नजराणा पेश करत संघाला सावरले. त्याने दमदार अर्धशतक झळकावले. इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI निवडकर्त्यांनी त्याच्यावर भरवसा दाखवलेला नाही. त्या मंडळींना त्याने मी जिथ खळतो तिथं बेस्ट देतो, हेच त्याने आपल्या बॅटिंगमधून दाखवून दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी संयम दाखवला, मग फटकेबाजीचा नजराणा पेश केला
श्रेयस अय्यरदिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीला त्याने संयमी खेळी करत आपल्यातील बेस्ट स्किल दाखवले. मग त्याने गियर बदलत फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ३३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. तो टेस्ट टीममध्ये स्थान न मिळाल्याचा राग दिल्लीकरांवर काढण्याच्या मूडमध्येच दिसत होता. पण ५३ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. कुलदीप यादवनं मोहित शर्माकरवी त्याला झेलबाद केले. त्याने १६० च्या स्ट्राइक रेटनं संघासाठी उपयुक्त खेळी केली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेस्ट दिल्यावरच वनडे संघात मिळाले होते स्थान, पण...
श्रेयस अय्यरची ही खेळी टी-२० क्रिकेटमध्ये व्हाइट बॉलवर आली असली तरी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्याची क्षमता असल्याची झलक त्या खेळीत दिसून आली. श्रेयस अय्यरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवलीये. त्याच जोरावर त्याची वनडे संघात निवड करण्यात आली होती. पण इंग्लंड दौऱ्यासाठी मात्र बीसीसीय निवडकर्त्यांना तो टेस्टमध्ये प्रभावी ठरेल, असे वाटत नाही. पण श्रेयस अय्यरनं जिथं संधी मिळते तिथं बेस्टचं देतो या अंदाजात क्लास खेळी करून दाखवली. या आधी टीम इंडियातून डच्चू मिळाल्यावर केंद्रीय करारातून त्याचे नाव गायब झाले होते. कोणतीही तक्रार न करता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला अन् टीम इंडियाच्या वनडे संघात परतला. आता कसोटीतही तो त्याच पद्धतीने कमबॅक करण्यास प्रयत्नशील असेल.
अय्यरची यंदाच्या हंगामातील कामगिरी
श्रेयस अय्यरनं गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन केले होते. यंदाच्या हंगामात पंजाब संघाचे नेतृत्व करताना त्याने या संघाला प्लेऑफ्सचे तिकीट मिळवून दिले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा संघही त्याच्या नेतृत्वाखाली फायनल खेळला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे. यंदाच्या हंगामात १३ सामन्यात त्याने ४८.३३ च्या सरासरीने ४८८ धावा केल्या आहेत.