ढाका: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बांगलादेशच्या अनपेक्षित माघारीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशी खेळाडू प्रचंड मानसिक धक्क्यात असून, संघातील दोन खेळाडू तर चक्क 'मेंटल कोमा'सारख्या स्थितीत गेल्याचा खळबळजनक दावा बांगलादेशचे वरिष्ठ साहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने (ICC) फेटाळून लावली. परिणामी, बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला.
प्रशिक्षकांचा आसिफ नजरुल यांच्यावर हल्लाबोल
प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी माजी क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सलाहुद्दीन म्हणाले की, "खेळाडू २७ वर्षांचं स्वप्न उराशी बाळगून वर्ल्ड कपची तयारी करत होते, पण राजकीय निर्णयामुळे ते स्वप्न एका सेकंदात चक्काचूर झाले. खेळाडूंना देशहितासाठी बलिदान देण्यास हरकत नसते, पण येथे उघडपणे खोटे बोलले गेले."
नजरुल यांनी आधी हा सरकारचा निर्णय असल्याचे सांगितले आणि नंतर बोर्ड आणि खेळाडूंचा सामूहिक निर्णय असल्याचे म्हणत 'यू-टर्न' घेतला. या दुटप्पी भूमिकेमुळे सलाहुद्दीन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुस्तफिजुर रहमान आणि IPL चा वाद
या वादाची ठिणगी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला बीसीसीआयच्या निर्देशानुसार रिलिज केल्यापासून पडली होती. त्यानंतर बांगलादेश सरकारने सुरक्षेचं कारण देत खेळाडूंना भारतात पाठवण्यास नकार दिला आणि आयपीएलच्या प्रसारणावरही बंदी घातली.