टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी भारत-पाक यांच्यातील सामन्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. बांगलादेशच्या संघावर अन्याय झाला असं म्हणत पाकिस्तानने थेट भारताशी पंगा घेतला आहे. १५ फेब्रुवारीला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना नियोजित आहे. या सामन्याआधी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध न खेळण्याची भूमिका स्पष्ट केली. या निर्णयामुळे PCB वर ICC च्या कारवाईची टांगती तलवारही लटकत आहे. दरम्यान आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी पलटी मारू शकतात, अशी बातमी समोर येत आहे. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुका भारत-पाक सामन्यासाठी टर्निंग पाँइट ठरेल, असेही समोर येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आणि बागंलादेशमधील निवडणुका यांच्यात काय कनेक्शन काय? जाणून घेऊया सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेश निवडणुकांसोबत भारत-पाक सामन्याचा तिढा सुटणार?
भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित लढतीच्या तीन दिवस आधी म्हणजेच १२ फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा निकाल मोहसिन नक्वींच्या बहिष्काराच्या निर्णयावर परिणाम करू शकतो, असे मानले जात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, PCB प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री १२ फेब्रुवारीला बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर आपली भूमिका बदलू शकतात. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारऐवजी बांगलादेशमध्ये लोकशाही सरकार सत्तेत आल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पलटी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
IND vs PAK : हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा! अश्विन म्हणतो; पाकिस्तान लवकरच यू टर्न घेईल अन्...
ICC ची कारवाई होऊ नये यासाठी मोर्चे बांधणी
याआधी काही माध्यमांनी असा दावा केला होता की, १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध न खेळण्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसू शकतो. पाकिस्तान ICC सोबत संभाव्य कायदेशीर लढाईसाठी तयारी करत आहे, जेणेकरून दंड, निलंबन किंवा इतर कठोर कारवाई टाळता येईल.
बांगलादेशचा बहिष्काराशी थेट संबंध
बांगलादेश संघाला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून वगळण्यात आल्यानं त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील राजकीय तणावपूर्ण परिस्थितीत BCCI नं बांगलादेशच्या मुश्तफिझूर रहिम याला IPL मधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय मैदानात खेळण्यास नकार दिला. आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळवावे, अशी विनंती बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेशातील युनूस सरकारने ICC कडे केली होती. हट्ट सोडण्यास तयार नसल्यामुळे ICC नं बांगलादेशला स्पर्धेबाहेर करत त्यांच्या जागी स्कॉटलंडच्या संघाला संधी दिली. यावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त करत भारताविरुद्ध पंगा घेतला आहे. जर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.