बंगळुरू: टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका गंभीर वादात अडकला आहे. विजयानंतर मैदानावर सेलिब्रेशन करताना भारतीय राष्ट्रध्वजाचा (तिरंग्याचा) अवमान केल्याचा ठपका ठेवत हार्दिक पांड्याविरोधात पुणे आणि बंगळुरूमध्ये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने विश्वचषक उंचावल्यानंतर खेळाडूंनी मैदानावर तिरंग्यासह धावत जल्लोष केला. यावेळी हार्दिक पांड्याने आपल्या मैत्रिणीसोबत (माहीका शर्मा) सेलिब्रेशन करताना तिरंगा आपल्या कंबरेखाली किंवा शरीराभोवती अशा पद्धतीने गुंडाळला होता, ज्यामुळे ध्वजाचा अवमान झाला, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. 'राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१' च्या तरतुदींचे हार्दिकने उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विश्वचषक जिंकला. या विजयानंतर हार्दिक पांड्या आपली मैत्रीण माहीका शर्मासोबत मैदानावर सेलिब्रेशन करत होता. व्हायरल व्हिडिओनुसार, हार्दिकने तिरंगा आपल्या पाठीला गुंडाळला होता आणि तो मैदानावर खाली झोपून सेलिब्रेशन करत होता. हार्दिक पांड्या आणि त्याच्या प्रेयसीचे मैदानावर प्रेमाचे चाळे सुरु होते. यावेळी हार्दिकच्या अंगावर तिरंगा होता. ही बाब पुण्यातील पुण्यातील वकील वाजिद खान यांना खटकली आहे. 'राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१' च्या कलम २ नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे बंधनकारक आहे. हार्दिक विजयाच्या धुंदीत तिरंगा अयोग्य पद्धतीने परिधान करून मैदानावर झोपला होता, ज्यामुळे ध्वजाची प्रतिष्ठा कमी झाली. पुणे पोलिसांनी ही तक्रार अर्जाच्या स्वरूपात स्वीकारली असून पुढील तपास सुरू केला आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
बंगळुरू येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने देखील स्थानिक पोलिसांत ही तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे, विशेषतः सार्वजनिक व्यक्तींचे कर्तव्य आहे; मात्र हार्दिकने विजयाच्या धुंदीत नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना अहमदाबादमध्ये घडली असली, तरी राष्ट्रध्वजाचा अवमान हा संपूर्ण देशाचा विषय असल्याने बंगळुरूमध्ये तक्रार नोंदवण्यात आल्याचे समजते.