नवी दिल्ली - आपला आक्रमक नेतृत्वाने क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा सौरव गांगुली आता आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अध्यक्ष निवडीसाठी रविवारी मुंबईती झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत अवेक नाट्यमय घडामोडींनंतर गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग गांगुलीसाठी तितकासा सोपा ठरला नाही.
जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौगर गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.
बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. मात्र अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत बृजेश पटेल यांचे नाव पुढे दामटण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तर सौरव गांगुलीनेही अमित शहांची भेट घेऊन बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाला अनुराग ठाकूर यांचाही पाठिंबा होता, असे सांगण्यात येत आहे. अनुराग ठाकूर यांनी यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच केंद्रीय मंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांची देशातील क्रिकेट प्रशासनामध्येही बऱ्यापैकी पकड आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सौगव गांगुलीचा कार्यकाळ १० महिन्यांचा असेल. गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्याच्याकडे क्रिकेट प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे.