Join us

"बाबर आझमने पाकिस्तानचे कर्णधारपद सोडावे", शाहिद आफ्रिदीने जाहीर केले ३ नवे कॅप्टन

मागील काही कालावधीपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खराब फलंदाजीमुळे ट्रोल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:17 IST

Open in App

नवी दिल्ली : मागील काही कालावधीपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खराब फलंदाजीमुळे ट्रोल होत आहे. टी-२० क्रिकेटमधील बाबरचा स्ट्राईक रेट पाहून पाकिस्तानी संघाच्या माजी खेळाडूंनी देखील त्याच्यावर निशाणा साधला होता. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदीचे म्हणणे आहे की, बाबर आझमने कर्णधारपद सोडून मोकळ्यापणाने फलंदाजी करायला हवी. टी-२० विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराला हा सल्ला दिला आहे.

खरं तर बाबर आझमने टी-२० संघाचे नेतृत्व दुसऱ्याच्या हाती सोपवावे अशी मागणी आफ्रिदीने केली आहे. पाकिस्तानमधील टीव्ही चॅनेलशी संवाद साधताना आफ्रिदीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "बाबरने स्वत: याबाबत निर्णय घ्यायला हवा. त्याचा तो निर्णय त्याच्या टी-२० मधील कर्णधारपदाबाबत असावा. मला वाटते की बाबरने त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. त्याने आगामी काळात कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले पाहिजे." अशा शब्दांत आफ्रिदीने बाबरला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला. 

बाबरने टी-२०चे कर्णधारपद सोडावे - शाहिद आफ्रिदी आफ्रिदीने तीन नवीन कर्णधारांची नावे जाहीर करताना म्हटले, "मला वाटते की टी-२० क्रिकेटसाठी एका नवीन चेहऱ्याला कर्णधार म्हणून संधी द्यायला हवी. मी बाबरचा खूप सन्मान करतो, एक खेळाडू म्हणून तो खूप चांगला आहे. मला हेच वाटते की बाबरने कमीत कमी दबावात खेळावे. त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करावे, मात्र टी-२० संघाची जबाबदारी दुसऱ्याला सोपवावी. पाकिस्तानकडे नेतृत्व करणारे खेळाडू आहेत, यामध्ये शादाब खान, मोहम्मद रिझवान आणि शान मसूद अशा खेळाडूंचा समावेश आहे." 

टी-२० विश्वचषकात खराब कामगिरी मोठ्या व्यासपीठावर नेहमीच बाबर आझमने पाकिस्तानी चाहत्यांना निराश केले आहे. अलीकडेच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात देखील हे पाहायला मिळाले. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने विश्वचषकातील ७  सामन्यांमध्ये केवळ १२४ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने १००च्या स्ट्राईक रेटनुसार देखील धावा केल्या नाहीत. यामुळेच त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटपाकिस्तानबाबर आजमशाहिद अफ्रिदीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App