क्रिकेट म्हटलं की, आजही अनेक चाहत्यांना दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटचं मैदान गाजवणारा सचिन तेंडुलकर आठवतो. आपल्या २४ वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचा शतकवीर आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजूनही सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. क्रिकेटच्या देवाच्या निवृत्तीसंदर्भात १३ वर्षांनी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बीसीसीआय निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष संदीप पाटील यांनी विकी लालवानी याला दिलेल्या खास मुलाखतीत सचिन तेंडुलकरच्या निवृत्ती आधी काय घडलं? त्यासंदर्भातील खास किस्सा शेअर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीसीसीआयनं सचिनचा पर्याय शोधायला सुरुवात केली अन्...
माजी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत की, बीसीसीआयने सचिन तेंडुलकरचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. संघातून बाजूला करण्याआधीच सचिन तेंडुलकरने स्वतःहून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. २०१२ हे वर्ष सचिनसाठी फारसे चांगले गेले नव्हते. त्यावर्षी त्याने ९ कसोटी सामन्यांत फक्त २३.८० च्या सरासरीने धावा केल्या. यात एकही शतक नव्हते. वनडेमध्येही १० सामन्यांत त्याची सरासरी ३१.५० अशी होती.
मिजास उतरली! टीम इंडियाचे सामने पाहत नाही म्हणत पाकिस्तानी क्रिकेटरनं दाखवला 'तोरा', बांगलादेशविरुद्ध वाजला...
ते ऐकून सचिनही झाला होता शॉक
सचिन जेव्हा धावांसाठी संघर्ष करत होता, तेव्हा त्याच्या पुढील योजनांबद्दल आपण त्याच्याशी चर्चा केल्याचे सांगताना Sandeep Patil म्हणाले, “मी त्याला विचारलं की पुढचा प्लॅन काय आहे? त्यावर त्याने ‘का?’ असा प्रश्न विचारला. त्यानंतर मी सांगितलं की निवड समिती तुझा पर्याय शोधत आहे. हे ऐकून सचिन ‘खरंच?’ असं म्हणत काहीसा धक्का बसल्यासारखा झाला.” पाटील पुढे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळाची आठवण अनेकदा फक्त सचिन तेंडुलकरच्या यांच्या निवृत्तीशी जोडली जाते. मात्र त्याच काळात जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमी यांसारख्या प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यात आली होती, याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
सचिनने बीसीसीआयकडे केली होती खास विनंती
सचिन तेंडुलकर याने नोव्हेंबर २०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळला. सचिनच्या विनंतीवरूनच हा सामना मुंबईत ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील किस्सा खुद्द सचिन तेंडुलकरने शेअर केला होता. आपल्या आईला हा सामना प्रत्यक्ष पाहता यावा, यासाठी सचिनने बीसीसीआयकडे खास विनंती केली होती.