Rohit Sharma Mumbai Cricket Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डाने म्हटले आहे की जर त्यांना टीम इंडियाच्या वनडे संघातील स्थान टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना आधी देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल. या आदेशानंतर, एका वृत्तात दावा करण्यात आला आहे की रोहित शर्मानेबीसीसीआयच्या आदेशानंतर स्पर्धेत खेळण्यास सहमती दर्शविली आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ला देखील कळवले आहे. पण आता MCA कडून सांगण्यात आले आहे की, रोहितने अद्याप असा कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात परतलेला रोहित शर्मा २०२७च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे. यापूर्वीही तो याबद्दल अनेक वेळा बोलला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच, तीन सामन्यांच्या मालिकेत शतक ठोकणारा तो एकमेव फलंदाज होता. तो अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे हे रोहितने दाखवून दिले. परंतु BCCI आणि सध्याचे संघ व्यवस्थापन त्याच्या वाढत्या वयामुळे आणि अलिकडच्या सुमार कामगिरीमुळे याबद्दल साशंक आहे.
बीसीसीआयने रोहित आणि विराटला सामन्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, रोहित देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचे त्याने एमसीएला कळवले. पण एमसीएचे मुख्य निवडकर्ता संजय पाटील यांनी खुलासा केला आहे की, रोहितने अद्याप संपर्क साधलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाटील म्हणाले, "मला रोहित शर्माकडून अद्याप कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. जर तो मुंबईकडून खेळला तर ते आमच्यासाठी चांगलेच असेल. त्याचा संघातील समावेश तरुण खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. बीसीसीआय, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी हे खूप चांगले पाऊल उचलले आहे."
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, ती स्पर्धा २४ डिसेंबरपासून ११ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण २६ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होत आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेआधी या दोघांना त्या स्पर्धेत खेळावे लागणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.