Fans Chaos Police, IND vs ENG ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑफलाइन तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. पण तिकीट खरेदी दरम्यान स्टेडियमबाहेर मोठा गोंधळ झाल्याची माहिती आहे. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक चाहते बेशुद्ध पडल्याचेही वृत्त आहे. तसेच, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करावा लागला.
नेमका कसा घडला प्रकार?
टीम इंडियाच्या या सामन्याची तिकिटे मिळविण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये पोहोचले होते. पण काही चाहते तिकिटांसाठी काउंटरवर चढू लागले, ज्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि पोलिसांना सुरक्षा राखण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
गोंधळात १० जण बेशुद्ध; १५ जखमी
या चेंगराचेंगरीत सुमारे १० जण बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे आणि १५ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिकृत आकडा कळलेला नाही. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने (ओसीए) अद्याप या घटनेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
चाहत्यांचा आरोप काय?
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप तिकीट खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांनी केला. मंगळवारी रात्रीपासून लोक तिकिटांसाठी रांगेत उभे होते आणि त्यानंतर बुधवारी सकाळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बाराबाती स्टेडियमची आसन क्षमता ४४,५७४ आहे. यापैकी २४,६९२ तिकिटे ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, कटकमध्ये ३ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.