T20 World Cup 2026 : भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या निर्णयामुळे बांगलादेशपाठोपाठ स्पर्धेबाहेर होण्याचा नौटंकी संपली, अशी चर्चा रंगू लागली. ICC नं तंबी दिल्यामुळे पाकिस्तान संघाने बहिष्कार टाकण्याचा इरादा बदलून संघाची घोषणा केली, अशी माहिती समोर येत असताना संघ निवडीसाठीच्या पत्रकार परिषदेतच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्याने मोठा 'बॉम्ब' फोडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचं की नाही? पाकिस्तान संघात गोंधळ!
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड निश्चित झाली असली तरी या स्पर्धेत खेळायचं की, नाही यासंदर्भातील संभ्रम अजूनही कायम आहे, असे वक्तव्य निवडकर्ते आकिब जावेद यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. निवडकर्त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केल्यामुळे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाबद्दल पाकिस्तानचा संघ अजूनही गोंधळलेला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.
ICC World Cup, IND vs PAK : ठरलं! टी-२० आधी वनडे वर्ल्ड कपमध्ये रंगणार भारत-पाक हायहोल्टेज सामना
आकिब जावेद यांचं वक्तव्य
संघ निवडीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आकिब जावेद म्हणाले, "आम्ही निवडकर्ते आहोत. आमचं काम संघ निवडणं आहे. अंतिम मुदतीच्या अगदी जवळ येऊन आम्ही संघाची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान सहभागी होणार की नाही, याचा निर्णय सरकार घेईल. या विषयावर मी काहीही बोलू शकत नाही. अध्यक्षांनीही हेच म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही निर्णयाची वाट पाहत आहोत."
पाक बोर्ड असो वा खेळाडू नौटंकी ही त्यांची परंपराच
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) हा नेहमीच आडमुठेपणामुळे चर्चेत राहिला आहे. ते कधी काय निर्णय घेतील याचा अंदाज बांधणं कठीण असते. आशिया कप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यावर त्यानंतर संबंधित सामन्यातील मॅच रेफ्रीवर आक्षेप नोंदवत त्यांना हटवा अन्यथा आम्ही आशिया कप स्पर्धेतील UAE विरुद्धचा सामनाच खेळणार नाही, असा पवित्रा पाक संघाने घेतला होता. पण शेवटी हा सामना नियोजित वेळेपेक्षा उशीराने सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. आशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाची जिरवली. पराभवानंतर मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी मीच देणार हा आडमुठेपणाचा डाव खेळला. परिणामी भारतीय संघाला ट्रॉफीशिवाय मायदेशी परतावे लागले. आता टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भातही त्यांची असाच काहीसा प्रकार सुरु आहे. पत्रकार परिषदेत PCB च्या निवडकर्त्याने नेमकं काय म्हटलंय? खरंच ते स्पर्धेतून माघार घेणार की, नौटंकीसह मैदानात उतरणार ते पाहण्याजोगे असेल.