Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...

क्रिकेटच्या मैदानात सध्या एक अजब 'ड्रामा' सुरू आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. म्हणे मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढलं म्हणून त्यांना भारतात असुरक्षित वाटतंय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:33 IST

Open in App

आगामी 'आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६' सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात मोठे राजकीय आणि क्रीडा युद्ध पेटले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेतली असून बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे.

हा वाद बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याच्यावरून सुरू झाला. बीसीबीच्या दाव्यानुसार, बीसीसीआयच्या सूचनेवरून मुस्तफिजूरला कोलकाता नाईट रायडर्स संघातून बाहेर काढण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी गंभीर आरोप केले. "भारतीय क्रिकेट अधिकाऱ्यांची धोरणे जातीयवादी आहेत. जर आमचा एक खेळाडू तिथे सुरक्षित नसेल, तर पूर्ण संघ भारतात कसा काय सुरक्षित वाटेल?" असा सवाल करत त्यांनी संघ भारतात न पाठवण्याची धमकी दिली.

बांगलादेश आणि भारत यांच्यातील या तणावात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली संधी शोधली आहे. श्रीलंका बांगलादेशचे सामने आयोजित करण्यास असमर्थ असेल, तर पाकिस्तान सर्व सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यास तयार आहे. पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सारख्या मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव असून त्यांची मैदाने सज्ज आहेत, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे,  आयसीसीने अद्याप बांगलादेशच्या पत्राला उत्तर दिलेले नाही. मात्र, जर बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, तर विश्वचषकाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

टी-२० विश्वचषक २०२६: बांगलादेशचे भारतातील वेळापत्रक

आयसीसीच्या वेळापत्रकानुकार, बांगलादेशला २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये काही सामने भारतीय भूमिवर खेळायचे आहेत. येत्या ७ फेब्रुवारीला बांगलादेशचा संघ वेस्ट इंडीजशी (ईडन गार्डन्स, कोलकाता) दोन हात करणार आहे. त्यानंतर ९ आणि १४ फेब्रुवारीला अनुक्रमे इटली आणि इंग्लंडशी भिडणार आहे. १७ फेब्रुवारीला बांगलादेशचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. 

टी२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघ

लिटन कुमार दास (कर्णधार), सैफ हसन (उपकर्णधार), तन्झीद हसन, परवेझ हुसेन इमोन, तौहिद हृदयॉय, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन आणि शोरिफुल इस्लाम. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan meddles in India-Bangladesh cricket row, citing security concerns.

Web Summary : Bangladesh fears India T20 World Cup security, wants matches in Sri Lanka. Pakistan offers to host, citing its own readiness after Bangladesh player treatment controversy.
टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026बीसीसीआयआयसीसीपाकिस्तानबांगलादेश