नवी दिल्ली: आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ सुरू होण्यापूर्वी क्रिकेट विश्वात मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्ताननेही भारताच्या विरोधात भूमिका घेत वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने दाखवलेल्या 'चाबूक'नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सर्व मस्ती जिरली असून, त्यांनी तातडीने आपला संघ जाहीर केला आहे.
आयपीएलमधून मुस्तफिजुर रहमानला रिलीज न केल्याच्या रागातून बांगलादेशने भारतात होणाऱ्या सामन्यांना विरोध केला होता. आयसीसीने कडक पाऊल उचलत बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या वादात उडी घेत पाकिस्तानचे पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बांगलादेशची बाजू घेतली आणि आयसीसीवर पक्षपाताचा आरोप केला. जर बांगलादेशवर अन्याय झाला तर पाकिस्तानही वर्ल्ड कप खेळणार नाही, अशी वल्गना नक्वी यांनी केली होती.
पाकिस्तानच्या या धमकीला आयसीसीने भीक न घालता थेट इशारा दिला. आयसीसीने स्पष्ट केले की, जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर त्यांच्यावर खालील कडक निर्बंध लादले जातील: पाकिस्तानच्या सर्व द्विपक्षीय मालिकांवर बंदी घातली जाईल. पीएसएलसाठी परदेशी खेळाडूंना एनओसी दिली जाणार नाही व पाकिस्तानला आशिया कपमधूनही बाहेर काढले जाईल.
पाकिस्तानची शरणागती
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला आयसीसीचे हे निर्बंध परवडणारे नव्हते. त्यामुळे आपली क्रिकेट कारकीर्द धोक्यात येईल या भीतीने पाकिस्तानने अवघ्या २४ तासात आपली भूमिका बदलली. रविवारी पाकिस्तानने टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला, ज्याचे नेतृत्व सलमान अली आगाकडे सोपवण्यात आले आहे.
बांगलादेश थोडक्यात सुटला...
या प्रकरणात बांगलादेश थोडक्यात सुटला आहे. आयसीसीने बांगलादेशवर असे काही निर्बंध लादलेले नाहीत. बांगलादेशला आयसीसी स्पर्धेत खेळण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला होता. परंतू, बांगलादेशकडून काहीच उत्तर न आल्याने आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला खेळण्याची परवानगी दिली आहे. एकप्रकारे या संघाची लॉटरीच लागली आहे. या संघाने जर चांगली कामगिरी केली तर भविष्यात हा संघ बांगलादेशला एक चांगला पर्याय ठरणार आहे.