आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला फुस लावत त्यांना बाहेर पडायला लावले आहे. तसेच आपण मात्र टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. बहिष्कारचे अस्त्र आयसीसीनेपाकिस्तानच्या क्रिकेटच्या मुळावर आल्यानंतर सपशेल नांगी टाकणाऱ्या या देशाने पुन्हा एकदा नव्या नाट्याला सुरुवात केली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाला विश्वचषकातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून, पाकिस्तान आता भारतासोबतच्या ग्रुप स्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी यासंदर्भात सूचक संकेत दिले आहेत.
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता आणि त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावत बांगलादेशला २४ तासांचा अल्टिमेटम दिला. प्रतिसाद न मिळाल्याने आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाद केले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. या निर्णयामुळे पाकिस्तान चिडला आहे.
पाकिस्तानची धमकी सुरुवातीला संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची पोकळ धमकी देणाऱ्या पाकिस्तानने आयसीसीच्या कडक कारवाईच्या भीतीने आपला संघ तर जाहीर केला, पण आता ते भारताविरुद्ध न खेळण्याचे हत्यार उपसत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नियोजित आहे. पीसीबीचा असा दावा आहे की, आयसीसीने बांगलादेशवर अन्याय केला असून हा 'डबल स्टँडर्ड' आहे.
मोहसीन नकवी यांचे वक्तव्य
पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी म्हणाले, "पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या देशाबाहेर आहेत. ते परतल्यानंतरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ. एका देशाने दुसऱ्या देशाला हुकूम देणे चुकीचे आहे. आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत."
जर पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांना केवळ दोन गुणांचे नुकसान सोसावे लागेल, परंतु आयसीसीला मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागू शकतो. मात्र, आयसीसी यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.