No Handshake Controversy, IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार देणे हा एक मोठा मुद्दा बनला. पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर खापर फोडले की, त्यांनी दोन्ही संघांना हस्तांदोलन करू नका, असे सांगितले. परंतु आता एक वेगळाच खुलासा समोर आला आहे, ज्याने साऱ्यांनाच धक्का बसू शकेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची काहीही चूक नाही. कारण त्यांनी त्यांना दिलेल्या आदेशांचे पालन केले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात आहे की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी आशियाई क्रिकेट परिषदेनेच आदेश दिले होते की भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनी टॉस दरम्यान हस्तांदोलन करू नये.
पाकिस्तानचे मोहसिन नक्वी स्वतःच अडकले...
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या एक दिवसानंतर १५ सप्टेंबर रोजी पीसीबीने आयसीसीला ईमेल पाठवून आरोप केला की मॅच रेफ्रीने टॉस दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. आयसीसीने ताबडतोब या प्रकरणाची चौकशी केली आणि पीसीबीला ईमेलद्वारे उत्तर दिले की पायक्रॉफ्टने आपली कर्तव्ये चांगली पार पाडली आहेत आणि आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही. ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की ते टॉस दरम्यान हस्तांदोलन न करण्याबाबत एसीसीच्या सूचनांचे पालन करत आहे. आता यातील महत्त्वाची बाब अशी की, एसीसीचे अध्यक्ष हे स्वतः पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी आहेत. जर एसीसीने हा आदेश जारी केला असेल तर मोहसिन नक्वी हेच या हस्तांदोलन वादाला थेट जबाबदार आहेत. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ईमेलमध्ये आयसीसीने पायक्रॉफ्ट यांचे कौतुक केले आहे की त्यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळले आणि टेलिव्हिजनवर कोणत्याही विचित्र घटना होणे टाळले.
पीसीबीने पुन्हा ईमेल पाठवला
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीसीबी आयसीसीच्या प्रतिसादावर नाराज झाली आणि आशिया कपमधून माघार घेण्याची धमकी दिली. त्यांनी सांगितले की जर पायक्रॉफ्ट यांना पाकिस्तानच्या सामन्यांतून काढून टाकले नाही, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून माघार घेईल. त्यानंतरही आयसीसी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी पुन्हा सांगितले की मॅच रेफरी नियम उल्लंघनासाठी दोषी नाहीत. तसेच, कोणत्याही संघाच्या सांगण्यावरून ते सामनाधिकारी बदलणार नाहीत. कारण यामुळे चुकीचा संदेश जाईल. या प्रतिसादानंतरही, १७ सप्टेंबर रोजी पीसीबीने आणखी एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आणि नंतर कोड उल्लंघन झाल्याचे म्हटले होते आणि पुन्हा मॅच रेफरीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रत्युत्तरात, आयसीसीने पीसीबीकडून अधिक माहिती मागितली, जी अद्याप देण्यात आलेली नाही.