India Beat Australia Reach Womens World Cup 2025 Final : नवी मुंबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या विक्रमी धावासंख्येचा यशस्वी पाठलाग करत भारतीय महिला संघाने फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकी खेळीशिवाय कर्णधार हरमप्रीत कौरनं या सामन्यात दमदार खेळीचा नजराणा पेश केला. ४९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अमनजोत कौरनं खणखणीत चौकार मारत भारतीय संघाचा ५ विकेट्स राखून विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी विजयासह टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला
२०१७ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नव्हता. यंदाच्या हंगमातही सर्व सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने सेमी फायनल गाठली होती. पण शेवटी पुन्हा एकदा भारतीय संघानेच ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी रथ रोखला. नवी मुंबईच्या मैदानात भारतीय संघाने ८ वर्षांची पुनरावृत्ती करत सात वेळच्या चॅम्पियनला यंदाच्या हंगामातील स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवत फायनलचं तिकीट बूक केले.
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
२५ वर्षांनी मिळणार नवा चॅम्पियन! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार फायनल
या निकालासह १३ व्या हंगामात महिला वर्ल्ड कप स्पर्धेत नवा विजेता मिळणार हे पक्के झाले आहे. २५ वर्षांनी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत नवा विजेता पाहायला मिळाले. याआधी इंग्लंडची मक्तेदारी मोडून काढत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फायनल गाठली होती. आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दबदबा मोडीत काढला आहे. २ नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा थरार पाहायला मिळेल.
जेमिमा रॉड्रिग्जची नाबात शतकी खेळी, हरमनप्रीतनंही दाखवली धमक
पहिल्यांदा फलंदाजी करताना फीबी लिचफिल्डच्या भात्यातून आलेली विक्रमी सेंच्युरी, एलिसा पेरी आणि ॲशली गार्डनर या दोघींच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सर्व बाद ३३८ धावा करत टीम इंडियासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. फायनल गाठण्यासाठी भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतीलच नव्हे महिला वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत कोणत्याही संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यात भारतीय संघाने धावफलकावर ५९ धावा असताना पहिल्या दोन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रती कौर जौडी जमली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचली. कर्णधार हरमनप्रीत कौर ८९ धावा करून माघारी फिरल्यावर जेमिमान शतकी खेळीकरून शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिने १३४ चेंडूत १४ चौकाराच्या मदतीने १२७ धावांची नाबाद खेळी केली. दीप्ती शर्मा २४ (१७) आणि रिचा घोष हिने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १६ चेंडूत २६ धावांची उपयुक्त खेळी केल्यावर मैदानात उतरलेल्या अमनजोत कौरनं ८ चेंडूत नाबाद १५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
महिला वनडेत ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ
- ३३९ – भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, मुंबई डी. वाय. पाटील, २०२५ वर्ल्ड कप
- ३३१ – ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला, विशाखापट्टणम, २०२५ वर्ल्ड कप
- ३०२ – श्रीलंका महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला, पॉटचेस्ट्रूम, २०२४