ठळक मुद्देटी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत असून भारतीय संघात निवड झालेल्या दोन खेळाडूंना बाहेर काढा, अशी मागणीही चाहत्यांनी केली आहे.
मुंबई - आयपीएल 2021 च्या पहिल्या 3 सामन्यात धुरंदर मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या मुंबईला तिसऱ्या सामन्यात विराट संघाने पराभूत केले. त्यामुळे, मुंबईचे चाहते नाराज झाले असून संघातील काही खेळाडूंवर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात काही दिवसांतच टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत असून भारतीय संघात निवड झालेल्या दोन खेळाडूंना बाहेर काढा, अशी मागणीही चाहत्यांनी केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची कामगिरी खराब झाली आहे. सूर्यकुमारच्या बॅटमधून अद्याप धडाकेबाज धावा पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे, सूर्यकुमार आणि इशान या दोघांनाही सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोघांचीही टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळेच त्यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असल्याने त्यांना टार्गेट केलं जात आहे. काहींनी तर विश्वचषक स्पर्धेतून यांना बाहेर करण्याचीही मागणी ट्विटरवरुन केली आहे.
आयसीसीच्या नियमानुसार टीम मॅनेजमेंटला अद्यापही संघात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच, या दोन्ही खेळाडूंना संघातून बाहेर करत शिखर धवन आणि श्रेयश अय्यर यांना संघात संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. युएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून भारताने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्याही सध्या ट्रोल होत आहे, हार्दीकला गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. पण, आयपीएल सामन्यात त्याच्याकडून अद्याप गोलंदाजी करण्यात आली नाही.