IPL 2025 Qualifier 1 RCB Beats PBKS And Enter 4th Final : पहिल्या क्वालिफायर लढतीत दिमाखदार विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने फायनल गाठली आहे. दुसरीकडे बॅटिंगमधील फ्लॉपशोमुळे गुणतालिकेत अव्वल राहिलेल्या पंजाब किंग्जवर क्वालिफायर लढत खेळावी लागणार आहे. चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात नाणेफेक जिंकून RCB कर्णधार रजत पाटीदारच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबचा डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने ८ विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह RCB च्या संघाने चौथ्यांदा फायनल गाठली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट स्वस्तात परतला, मग सॉल्टचं दमदार अन् नाबाद अर्धशतक, रजत पाटीदारनं सिक्सरसह संपवली मॅच
पहिल्यांदा फंलदाजी करताना आरसीबीच्या भेदक माऱ्यासमोर पंजाब किंग्जच्या एकाही फलंदाजांचा निभाव लागला नाही. स्टॉयनिसनं १७ चेंडूत केलेल्या २६ धावा ही पंजाबच्या ताफ्यातून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्याशिवाय प्रभसिमरन सिंग १८ (१०) आणि अझमतुल्लाह ओमरझाई १८ (१२) या दोघांनी दुहेरी आकडा गाठला. परिणामी पंजाबचा संघ १४,१ षटकात १०१ धावांवर आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीनं आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. कोहली १२ धावा करून परतला. पण सॉल्ट शेवटपर्यंत थांबला. त्याने यंदाच्या हंगामात धावांचा पाठलाग करताना चौथे अर्धशतक झळकावत संघाचा विजय सहज सोपा केला. २७ चेंडूत फिल सॉल्टनं नाबाद ५६ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार रजत पाटीदार याने षटकार मारत मॅच संपवली. त्याने ८ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १५ धावांची खेळी केली.
चौथ्या प्रयत्नात पहिल्यांदा ट्रॉफी उंचावण्याची संधी
आरसीबीचा संघ २००९, २०११ आणि २०१६ नंतर आता चौथ्यांदा फायनल खेळताना दिसणार आहे. पहिल्या हंगामापासून १८ नंबर जर्सीतील किंग कोहली या संघासोबत आहे. पण संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. अधुरं स्वप्न साकार करण्यासाठी आता RCB च्या संघाला फक्त एका विजयाची गरज आहे. ते यावेळी फायनल जिंकून पहिल्यांदा ट्रॉफी उंचावणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पंजाबची फायनल खेळण्याची अजूनही संधी
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबच्या संघाला अपयश आले असले तरी या संघाला अजूनही फायनल खेळण्याची संधी आहे. एलिमिनेटरच्या लढतीतील विजेत्यासोबत ते क्वालिफायर खेळताना दिसतील. हा संघही अद्याप एकही ट्रॉफी जिंकलेला नाही. जर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांनी बाजी मारली तर फायनलमध्ये पुन्हा एकदा आरसीबी वर्सेस पंजाब असे चित्रही पाहायला मिळू शकते.