IPL 2025 Eliminator Mumbai Indians Won By 20 Runs Gujarat Titans : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने एलिमिनेटरचा सामना जिंकत क्लालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह हंगामात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरातसमोर २२९ धावांचे टार्गेट ठेवले होते. आयपीएलमध्ये धावफलकावर २०० धावा लावल्यावर MI नं सामना कधीच गमावलेला नाही. हा रेकॉर्ड आणखी भक्कम करत मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील फायनलच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता क्वालिफायर २ च्या लढतीत मुंबई इंडियन्सचा संघ १ जूनला पंजाब किंग्ज विरुद्ध भिडेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् सामन्यात 'बेबी ओव्हर' ट्विस्टही दिसलं
अखेरच्या १८ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पांड्याने ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात राहुल तेवतियाने एक षटकार मारला. पण त्यानंतर बुमराहनं दमदार कमबॅकही केले. या षटकात त्याने फक्त ९ धावा खर्च केल्या. १२ चेंडूत ३६ धावांची गरज असताना बोल्टनं रुदरफोर्डच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेत गुजरातला आणखी बॅकफूटवर ढकलले. या षटकातही १२ धावा गेल्या. अखेरच्या षटकात २४ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या कुणाला ओव्हर देणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. गुजरातच्या ताफ्यातून राहुल तेवतिया आणि शाहरुख खान दोघेही मोठी फटकेबाजी मारण्यात तरबेज असल्यामुळे सामना सेफ आहे असं नव्हते. मग रिचर्ड ग्लीसन शेवटचं षटक घेऊन आला. साईची विकेट त्यानेच घेतली होती. या षटकातील पहिले तीन अचूक टप्प्यावर टाकत त्याने गुजरातच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या. स्नायू दुखापतीमुळे तीन चेंडू टाकून तो थांबला. मग अश्वनी कुमारनं उर्वरित ३ चेंडू टाकत हे षटक संपवल. 'बेबी ओव्हर' ट्विस्टसह सामना संपला अन् MI नं यात बाजी मारत क्लालिफायर २ चं तिकीटही मिळवलं.
MI कडून रोहित शर्माचे दमदार अर्धशतक, अन्य फलंदाजांनीही लुटली मैफिल
चंडीगडच्या मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या ८१ (५०) भात्यातून आलेले दमदार अर्धशतकासह बेअरस्टो ४७ (२२), सूर्यकुमार यादव ३३ (२०), तिलक वर्मा २५ (११), हार्दिक पांड्या २२ (९)* आणि नमन धीर ९ (६) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २२८ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २२९ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते.
शुबमन गिल पहिल्याच षटकात माघारी फिरला, साई-वॉशिंग्टनची जोडी जमली, पण...
दोनशे पारच्या लढाईत गुजरात टायटन्सच्या संघाने अवघ्या ६७ धावांवर आघाडीच्या दोन विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार शुबमन गिल पहिल्याच षटकात एका धावेची भर घालून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कुशल मेंडिसनं १० चेंडूत २० धावा करुन हिट विकेटच्या रुबात संघाच्या अडचणी वाढवल्या. मग साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरत असताना १४ व्या षटकात बुमराह गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील चौथ्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर वॉशिंग्टनला क्लीन बोल्ड केले. तो २४ चेंडूत ४८ धावांची खेळी करून परतला. १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिचर्ड ग्लीसन याने साई सुदर्शनच्या रुपात मोठी विकेट्स घेतली. या दोन विकेट्समुळे मुंबई इंडियन्सचा संघ मॅचमध्ये आला. साई सुदर्शन याने ४९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८० धावांची खेळी केली.