कोलंबो : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे यजमान श्रीलंकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तरीही भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाला बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामनाही पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बांगलादेशला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.
कोलंबो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे गट साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर भारत आणि बांगलादेश यांना अंतिम फेरीत धडक मारली. भारताने अ गटात तीनही सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेशनेही ब गटातील तीनही सामने जिंकत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.