"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा

गाबा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भाष्य केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:50 IST2024-08-07T17:48:21+5:302024-08-07T17:50:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian team was treated badly after winning the Gabba Test Says Shardul Thakur | "टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा

"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा

Shardul Thakur : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने अलीकडेच एका ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनला खोटारडे म्हटलं आहे. ब्रिस्बेन येथील गाबा येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२०-२१ च्या अंतिम कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर तीन गडी राखून केलेल्या शानदार विजय मिळवला होता.  त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने केलेल्या टिप्पण्यांना शार्दुलने प्रत्युत्तर दिले आहे. शार्दुल ठाकूरने २०२०-२१ या वर्षातील ऑस्ट्रेलिया दौरा हा सर्वात भयानक दौरा असल्याचे म्हटलं. गाबा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना अतिशय वाईट वागणूक मिळाली. क्वीन्सलँडच्या लेडी गव्हर्नरनेही आपल्याला भेटण्यास नकार दिल्याचेही शार्दुल ठाकूरने सांगितले.

ब्रिस्बेनमध्ये बायो-बबल नियमांमुळे, भारताने सिडनीमध्ये राहण्याची आणि सिडनी क्रिकेट मैदानावरच अंतिम कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबत बोलताना शार्दुल सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला दिलेल्या खराब वागणुकीबद्दल भाष्य केलं. नुकताच शार्दुल ठाकूर एका कार्यक्रमात गेला. येथे त्याला गाबा कसोटी सामना जिंकल्यानंतरचा किस्सा विचारण्यात आला. याला उत्तर देताना शार्दुल ठाकूर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात भयानक वागणूक दिल्याचे म्हटलं आहे. शार्दुल ठाकूरने या दौऱ्याचे वर्णन सर्वात वाईट दौरा असं केलं आहे. 

टिम पेनच्या मुलाखतीमध्ये खोटेपणाशिवाय काही नव्हते. तो स्पष्टपणे गोष्टी रचून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. विराटच्या अनुपस्थितीत आमचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार अजिंक्य रहाणे हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाशी सुविधांवरून सतत वाद घालत होते. या दौऱ्यात अनेक खेळाडू जखमी झाले. अंतिम सामन्यातही सैनी आणि नटराजन या दोघांना दुखापत झाली होती. दुसऱ्या डावात सिराज आणि मी लागोपाठ नऊ षटके टाकली. विजयानंतर आम्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे पाहिलेही नाही, फक्त त्यांना त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये परत जाण्यास सांगितले, असं शार्दुल ठाकूर म्हणाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची कामे स्वतःलाच करावी लागल्याचे शार्दुलने सांगितले. "२०२०-२१ दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने आमच्याशी ज्या प्रकारे वर्तणूक केली ती भयावह होती. हॉटेलमध्ये चार-पाच दिवस कोणतीही हाऊसकीपिंग सेवा मिळाली नाही. तुम्हाला तुमची बेडशीट बदलायची असेल तर तुम्हाला ४ ते ५ मजल्यांच्या पायऱ्या चढून जावे लागेल. तुम्ही स्वतःचे काम करा असे सांगितले. क्वीन्सलँडच्या लेडी गव्हर्नरलाही भारतीयांना इथे यायचे नसेल तर त्यांनी येऊ नये, असे म्हणताना ऐकले. आम्ही त्यांना होस्ट करू इच्छित नाही," असे म्हणाल्याचे ठाकूरने सांगितले.

Web Title: Indian team was treated badly after winning the Gabba Test Says Shardul Thakur