Join us

India vs South Africa, 2nd Test : दोन वर्षांपूर्वी पुण्यात टीम इंडियानं पत्करलेली शरणागती, तिथेच आफ्रिकेशी सामना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:16 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारताने पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मानं कसोटीत प्रथम सलामीला येताना दोन्ही डावात शतकी खेळी करून इतिहास घडवला. त्याच्या या खेळीला मयांक अग्रवाल, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांची उत्तम साथ लाभली. मालिकेतील दुसरा सामना ज्या पुण्यात खेळवला जाणार आहे, त्या स्टेडियमवरील टीम इंडियाची कामगिरी चिंता वाढवणारी आहे. 

दोन वर्षांपूर्वी येथे झालेल्या कसोटीत टीम इंडियानं सपशेल शरणागती पत्करली होती आणि तीन दिवसांतच सामन्याचा निकाल लागला होता. विशेष म्हणजे या सामन्यात जवळपास 30 विकेट्स या फिरकीपटूंनीच पटकावली होती. अनपेक्षित उसळीमुळे फलंदाजांनाही येथे खेळणे अवघड गेले होते. टीम इंडियाच्या त्या हाराकिरीनंतर स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर हेही चर्चेत आले होते. त्यामुळे उद्याच्या कसोटीत खेळपट्टी नेमकी कोणाला साथ देईल, याची उत्सुकता लागलेली आहे. पण, 2017मध्ये नेमकं असं काय घडलं होतं?

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना होता. तसेच पुण्यातील स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता. मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पाहुण्यांना दमदार सुरुवात करून दिली. पण, त्यानंतर ऑसींचा डाव गडगडला. रेनशॉनं 68 धावांची खेळी केली आणि मिचेल स्टार्कने 61 धावा करताना संघाला 260 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.

ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळल्यानंतर टीम इंडिया सहज मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पण, घडलं भलतंच. लोकेश राहुल (64) वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातलं. स्टीव ओ'किफनं 35 धावांत भारताचे 6 फलंदाज माघारी पाठवले. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत असल्याचे दिसल्यानं भारत ऑसींचा दुसरा डाव लवकर गुंडाळेल असे वाटले. पण, तेथेही स्टीव्ह स्मिथने कडवी खेळी केली. त्यानं 109 धावांची खेळी करताना संघाला 285 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या आर अश्विन ( 4/119) आणि रवींद्र जडेजा ( 3/65) यांनी सुरेख कामगिरी बजावली.

441 धावांच्या विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेला भारताचा संघ 107 धावांत तंबूत परतला. ओ'किफ ( 6/35) आणि नॅथन लियॉन ( 4//53) यांच्या फिरकीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. कसोटी इतिहासातील भारताचा हा लाजीरवाणा पराभव ठरला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाआॅस्ट्रेलियापुणे