IND vs PAK after Champions Trophy 2025: पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी सहज विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सौद शकीलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २४१ धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर आठ षटके राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. आता या स्पर्धेत तर पाकिस्तानी संघ विजय न मिळवता स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे भारत-पाकिस्तानचा ( India vs Pakistan ) पुन्हा सामना होणार नाही. पण या वर्षात भारत आणि पाकिस्तानचे संघ मात्र पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. जाणून घेऊया कुठली आहे ती स्पर्धा.
भारत-पाकिस्तान महामुकाबला पुन्हा होणार!
यंदाच्या वर्षी आशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरीही भारत पाकिस्तानचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवले जातील अशी शक्यता आहे. २०२३चा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये होता. पण यंदा २०२५ चा आशिया कप टी२० स्वरूपाचा असणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा ICCचा इतिहास पाहता, भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच गटात असतो. त्यामुळे या वेळीही दोन्ही संघ पहिल्यांदा साखळी फेरीत भिडतील. त्यानंतर दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली तर सुपर-४ आणि फायनल असे तीन वेळा चाहत्यांना भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याची मेजवानी अनुभवता येईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची खराब कामगिरी
सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान यजमान आहे. पण त्यांना साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. प्रथम न्यूझीलंडच्या संघाने त्यांना पाकिस्तानमध्ये सहज पराभूत केले. त्यानंतर दुबईच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशविरूद्ध होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. अशा परिस्थितीत आपल्याच यजमानपदाच्या स्पर्धेत पाकिस्तानी संघाला एकही विजय न मिळवता स्पर्धेतून बाद व्हावे लागले.