Join us

माहेर घरात पराभवाचा 'आहेर'; टीम इंडियानं व्याजासह परतफेड करत यजमान पाकला काढलं स्पर्धेबाहेर

भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर यजमान पाकिस्तानचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 22:01 IST

Open in App

IND vs PAK, Champions Trophy  2025 : दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या हायहोल्टेज लढतीत भारतीय संघानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. विराटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानला ६ विकेट्स राखून पराभूत केले. दुबईचं क्रिकेट मैदानं म्हणजे पाकिस्तानसाठी माहेर घरच. इथं पाकिस्तान एवढ्या मॅचेस कुणीच खेळलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या माहेर घरात भारताने त्यांना पराभवाचा 'आहेर' देत २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमधील पराभवाचा वचपा काढलाय. टीम इंडियानं गत हंगामातील पराभवाची व्याजासह परतफेड करत यजमान स्पर्धेला जवळपास यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय. कारण पाकिस्तान संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. जर तरच्या समीकरणावर ते थोडा काळ स्पर्धेत टिकतील, पण गत चॅम्पियन पाकिस्तान  यंदाच्या ंहगामात सेमीपर्यंत मजल मारणं मुश्किलच आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तान संघानं ४९.४ षटकात २४१ धावा काढल्या होत्या. या धावांचा भारतीय संघानं यशस्वी पाठलाग करत सेमी फायनलमधील तिकीट जवळपास निश्चित केलंय. दुसरीकडे न्यूझीलंड पाठोपाठ भारतीय संघाविरुद्धच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवासह गत चॅम्पियन पाकिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीशिवाय श्रेयस अय्यरनं केलेल्या दमदार अर्धशतकासह शुबमन गिलनं ५२ चेंडूत ४६ धावांची उपयुक्त खेळी केली. रोहित शर्मानं डावाला सुरुवात करताना १५ चेंड़ूत २० धावा काढल्या.   

पाकिस्ताननं रडत खडत गाठला २४१ धावसंख्येचा आकडा

दुबईच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा मोहम्मद रिझवानचा डाव सपशेल फसला. सौद शकीलनं ७६ चेंडूत केलेल्या ६२ धावा आणि कॅप्टन मोहम्मद रिझवानच्या ७७ चेंडूतील ४६ धावांच्या खेळीसह खुशदिल शाहनं केलेल्या ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघानं रडत खडत २४१ धावांचा आकडा गाठला होता. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने दोन पाकिस्तान फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पाकिस्तानच्या संघाने दोन विकेट्स या रन आउटच्या रुपात गमाल्या. 

रोहित तंबूत परतल्यावर गिल-कोहलीनं सावरला डाव

पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मानं पहिल्या षटकात सावध पवित्रा घेत बॅटिंग केली. पण दुसऱ्या षटकात त्याने आपला आक्रम अंदाज दाखवून दिला. ही जोडी पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणेल, असे चित्र निर्माण झाले असताना शाहीन शाह आफ्रिदीनं रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. मग विराट कोहली आणि शुबमन गिल ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची मॅच सेट करणारी भागीदारी रचली. शुबमन गिल शुबमन गिल ५२ चेंडूत ४६ धावांवर बाद झाल्यावर श्रेयस अय्यर मैदानात उतरला. त्यानेही  उपयुक्त अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी रचली.

अय्यर-विराटची शतकी भागीदारी

विराट कोहली आणि श्रेयस अय्य जोडीनं भारताचा विजय जवळपास निश्चित केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी११४ धावांची दमदार भागीदारी रचली. अय्यर ६७ चेंडूत ५६ धावा करून परतल्यावर हार्दिक पांड्या ६ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला. अक्षर पटेलच्या साथीनं विराट कोहलीनं चौकार मारत मॅच संपवली. कोहलीनं११ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने  १११ धावांची नाबाद खेळी साकारली. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५शुभमन गिलश्रेयस अय्यर