Sanju Samson on Jasprit Bumrah : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात विक्रमी धावसंख्या उभारून अखेरच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सेमीफायलमध्ये इंग्लंडला ७ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा फायनल खेळताना दिसेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जेकब बेथेलच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडचा संघ अखेरच्या षटकापर्यंत सामन्यात होता. १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं अचूक मारा करत सामना भारताच्या बाजूनं फिरवला. याच गोष्टीवरुन सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी खेळीसह सामनावीर ठरलेल्या संजू सॅमसन याने मोठ्या मनाने जसप्रीत बुमराहच या सामन्याचा खरा हिरो आहे, असे बोलून दाखवले.
संजू सॅमसनचा बॅक टू बॅक हिट शो!
इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसन याने ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात धावफलकावर विक्रमी २५३ धावसंख्या उभारली होती. त्यामुळे सामनावीरच्या रुपात संजू सॅमसनला गौरवण्यात आले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यानंतर सलग दुसऱ्यांदा तो सामनावीर ठरला.
बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट मिळाल्याचा गैरसमज! साक्षीचा जल्लोष पाहून MS धोनीला हसू अनावर (VIDEO)
खरंतर सामनावीर पुरस्काराचा मानकरी बुमराहच, संजू सॅमसन नेमकं काय म्हणाला?
सामन्यानंतर संजू म्हणाला की, "मागच्या सामन्यात फॉर्म परत मिळवल्यावर सातत्य कायम ठेवणं गरजेचे होते. सुरवातीला नशीबही साथ देत होते. आम्ही ठरल्याप्रमाणे २५० धावांपर्यंत पोहचलो. पण वानखेडेच्या मैदानात या धावांचा बचाव करणं सोपे नव्हते. आज संघाने ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. पण विजयाचं खरं श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पिढीतून एकदाच असा गोलंदाज तयार होतो. आज त्याने ते सिद्ध केलं. खरं तर हा पुरस्कार त्यालाच मिळायला हवा होता. डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी झाली नसती तर कदाचित मी इथे उभा नसतो." असे म्हणत संजूनं जसप्रीत बुमराहमुळेच टीम इंडियानं फायनल गाठल्याचे म्हटले आहे.