Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल

सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ३ चेंडूत गमावल्य ३ विकेट्स अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:11 IST

Open in App

Asia Cup Rising Stars 2025 Bangladesh A Shock India A In Super Over To Enter Final : रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. त्यातही बांगलादेशच्या संघाने एकही चेंडूचा सामना न करता फायनल गाठत भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एकही चेंडूचा सामना न करता बांगलादेशनं साधला फायनल गाठण्याचा डाव

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघातील फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे बांगलादेशच्या संघाने सहज फायनल गाठल्याचे पाहायला मिळाले. सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर नियमानुसार, भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. वैभव सूर्यवंशीला पाठवून जोखीम पतकरण्याऐवजी कर्णधार जितेश शर्मा फलंदाजीला आला. पण हा प्रयोग फसवा ठरला. रिपन मंडोल याने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्करवर त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर रिपन मंडोल (Ripon Mondol) याने त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या आशुतोष शर्माला झेलबाद केले. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने दोन चेंडूत २ विकेट गमावल्यामुळे बांगलादेशच्या संघाला फक्त एका धावेच टार्गेट मिळाले होते.

IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट

सुपर ओव्हरमध्ये सुयशनं पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, पण... 

बांगलादेशचा संघासाठी एक धाव काही फार मोठा टास्क नव्हते. पण भारताकडून सुपर ओ्हर घेऊन आलेल्या  सूयश शर्मानं पहिल्याच चेंडूवर बांगलादेशला धक्का देत सामन्यात आणखी ट्विस्ट आणले.  सामन्यात पुन्हा एक संधी मिळवून फायनल गाठण्याची आस कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटची आवश्यकता होती. पण सूयशचा दुसरा चेंडू टप्पा पडल्यावर लेग स्टंपच्या बाहेर गेला. नियमाप्रमाणे मैदानातील पंचांनी हा चेंडू वाइड घोषित केला. त्यामुळे या अवांतर धावेसह एकाही चेंडूचा सामना न करता मॅच जिंकत बांगलादेशच्या संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेची फायनल गाठली.

वैभव-प्रियांश आर्यचा स्फोटक अंदाज, तरीही टीम इंडियाला जिंकता आली नाही मॅच

सलामीवीर हबीबुर रहमान सोहानच्या अर्धशतकी खेळीनंतर एसएम मेहरोब हसन याने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १९४ धावा करत भारतीय संघासमोर १९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने १५ चेंडूत  २५३.३३ च्या स्ट्राइक रेटनं ३८ धावा केल्या. प्रियांश आर्यनंही २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ धावांची दमदार खेळी केली. सलामी जोडी माघारी फिरल्यावर कर्णधार जितेश शर्मा आणि नेहल वढेरा जोडी जमली. दोघांनी ३३ चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचत सामना भारताच्या बाजूनं सेट केला होता. पण मोक्याच्या क्षणी कर्णधार जितेश शर्मानं आपली विकेट गमावली.

आशुतोष शर्मानं मॅचमध्ये ट्विस्ट आणले, पण फिनिश करायच्या वेळी तो फसला अन्...

जितेश शर्माची जागा घेण्यासाठी आलेला रमनदीप सिंग २१ चेंडूत २६ धावा करून परतल्यावर IPL मध्ये आपला फिनिशिंग तोरा दाखवणारा आशुतोश शर्मा याने ८ चेंडूत १५ धावांची खेळी केली. त्याने हातून निसटलेला सामना पुन्हा भारताच्या बाजूनं वळवला. पण २ चेंडूत ४ धावांची गरज असताना तो बोल्ड झाला. त्याच्या जागी आलेल्या हर्ष दुबेनं अखेरच्या चेंडूवर ३ धावा घेत सामना बरोबरीत नेला. पण सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघ अपयशी ठरला, दबावात वैभव सूर्यवंशी मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावेल, असा विचार करून जो प्रयोग केला तो फसवा ठरला. दोन चेंडूत दोन विकेट गमावल्या अन् भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये फायनलचा डाव साधण्याची संधी गमावली.

English
हिंदी सारांश
Web Title : India A's Super Over Flop: Bangladesh Reaches Final Without a Ball!

Web Summary : Bangladesh A reached the final of the Rising Star Asia Cup in a dramatic super over, defeating India A. India A collapsed in their super over without scoring a run. Bangladesh won without facing a single ball.
टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध बांगलादेशवैभव सूर्यवंशी