Team India Test Squad Announced against West Indies: वेस्ट इंडिजविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला. २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. पहिला सामना अहमदाबाद येथे २ ते ६ ऑक्टोबरला होणार आहे. तर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्ली येथे १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या मालिकेसाठी शुबमन गिल भारताचा कर्णधार तर रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने रविंद्र जाडेजा उपकर्णधार असणार आहे. अनुभवी श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळूनही चांगली कामगिरी करता न आलेल्या करुण नायरलाही संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय पायाच्या दुखापतीमुळे विश्रांती घेत असलेल्या रिषभ पंतच्या अनुपस्थितीत एन जगदीशन आणि ध्रुव जुरेल या दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारताचा १५ खेळाडूंचा संघ- (Team India Test Squad)
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन. जगदीशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
करुण नायर बाहेर; देवदत्त पडिक्कल, अक्षर पटेल संघात
करुण नायरची इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. त्यामुळे या मालिकेत स्थान मिळणार नाही अशी आधीच चर्चा होती आणि नेमके तसेच घडले. नायरला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्याजागी देवदत्त पडिक्कला संघात स्थान मिळाले. तसेच, अक्षर पटेल देखील संघात परतला. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते.
पंत नसताना ध्रुव जुरेलला पहिला पसंती
पायाला फ्रॅक्चर झालेला यष्टीरक्षक ऋषभ पंत वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल पहिल्या पसंतीचा बदली खेळाडू म्हणून खेळेल. तर तामिळनाडूचा एन. जगदीशन बॅकअप यष्टीरक्षक असेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फिरकी गोलंदाज म्हणून संघात रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत. असे असताना कुलदीप यादवला संघात स्थान मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वेस्ट इंडिजचा कसोटी संघ
केवरॉन अँडरसन, अॅलिक अथानाझे, जॉन कॅम्पबेल, टेगनारिन चंद्रपॉल, शाय होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, खेरी पियर, जॉन वॉरिकन, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स
भारत-वेस्ट इंडिज कसोटी आकडेवारी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत १०० कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने २३ कसोटी सामने जिंकले आहेत आणि वेस्ट इंडिजने ३० कसोटी सामने जिंकले आहेत. दोघांमध्ये एकूण ४७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. वेस्ट इंडिजने २००२ मध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारतानेच कसोटीत वर्चस्व गाजवले आहे.