टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ च्या लढतीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचा सेमी फायनलचा मार्ग खडतर झाला आहे. उर्वरित दोन्ही सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागणार आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि डेविड मिलर ही दोन नावे चांगलीच चर्चेत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
किलर मिलर अन् वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील वादग्रस्त घटना चर्चेत
एका बाजूला डेविड मिलरनं संघ अडचणीत असताना किलर खेळी करत संघाला सावरण्याचे काम केले. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदर उप कर्णधाराच्या जागी मिळालेल्या संधीच सोनं करण्यात अपयशी ठरला. मैदानातील यश अपयशापलिकडे ही दोन नावे मैदानातील वादामुळेही चर्चेत आहेत. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढती दरम्यान वॉशिंग्ट सुंदर आणि डेविल मिलर यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. दोघांचा मैदानातील राडा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं कधी आणि काय घडलं? यासंदर्भातील सविस्तर माहिती
आयसीसीच्या त्या एका नियमामुळे भारत सामना हरला? जादाचा एक खेळाडू सीमारेषेवर असता तर...
मैदानात नेमकं कधी अन् काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १४ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. या षटकात तो डेवॉल्ड ब्रेविसला चेंडू टाकताना नॉन स्ट्राईक एन्डला असलेल्या डेविड मिलरने एक चोरटी धाव घेण्यासाठी आधीच क्रीजमधून बाहेर पडत असल्याची तक्रार वॉशिंग्टन सुंदरने मैदानातील पंचांकडे केली. त्यानंतर मग मिलर थेट भारतीय गोलंदाजाच्या दिशेनं आला. दोघांच्या शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानातील पंच आणि भारतीय विकेट किपर ईशान किशन यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्याचे पाहायला मिळाले.
मिलरची किलर खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचं कमबॅक अन्....
भारतीय गोलंदाजांनी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पॉवर प्लेमध्ये बॅकफूटवर ढकलले होते. संघ अडचणीत असताना डेविड मिलरनं डेवॉल्ड ब्रेविसच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. या जोडीनंतर ट्रिस्टन स्टब्सने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १८.५ षटकात १११ धावांवरच आटोपला.