कोलंबो: क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत पुन्हा एकदा एकतर्फी ठरली आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत आपला विजयरथ कायम राखला. भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. आपल्या संघाची दैना आणि निश्चित असलेला पराभव पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्यासह पाकिस्तानी प्रेक्षकांनीही सामना संपण्यापूर्वीच स्टेडियममधून काढता पाय घेतला.
केवळ बोर्डाचे अध्यक्षच नव्हे, तर मोठ्या आशेने सामना पाहायला आलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनीही 'बॉयकॉट'चा मार्ग स्वीकारला. १८ व्या षटकात पाकिस्तानचा संघ केवळ ११४ धावांवर गारद झाला. जेव्हा संघाचे ५ महत्त्वाचे फलंदाज अवघ्या ७३ धावांवर बाद झाले, तेव्हाच चाहत्यांनी स्टेडियम सोडायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावरही पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्या संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय गोलंदाजांचा थरार
भारताच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या ४ षटकांतच पाकिस्तानचे कंबरडे मोडले. दोघांनी मिळून २५ धावांत ३ बळी घेतले. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी दोन बळी घेत पाकिस्तानला सावरण्याची संधीच दिली नाही. विशेष म्हणजे, अर्धवेळ फिरकीपटू तिलक वर्मानेही आपल्या पहिल्याच चेंडूवर शादाब खानला बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
ईशान किशनची वादळी खेळी
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला, पण ईशान किशनने ७७ धावांची (१० चौकार, ३ षटकार) शानदार खेळी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याने पॉवरप्लेमध्ये तुफानी फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सामना संपल्यानंतर बीसीसीआय पदाधिकारी आणि भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये जल्लोष केला, तर दुसरीकडे पाकिस्तानी गोटात शांतता पसरली होती.