Shubman Gill on Jasprit Bumrah Availability, IND vs ENG: भारतीय संघाला पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने ५ गडी राखून पराभव केले. पहिल्या डावात भारताने ४७१ तर इंग्लंडने ४६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताला ३६४ धावाच करता आल्या. इंग्लंडने ३७१ धावांचे आव्हान शेवटच्या दिवशी सहज पार केले. भारतीय संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या डावात एकही बळी घेता आला नाही. तसेच, बुमराह या मालिकेत पाच पैकी तीन सामनेच खेळणार आहे असे मालिका सुरु होण्याआधीच सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत बुमराह आता कुठले सामने खेळणार? असा सवाल कर्णधार शुबमन गिलला सामन्यानंतर विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले.
जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार?
रोहित शर्मा कर्णधार असताना जसप्रीत बुमराह उपकर्णधार होता. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा कसोटीत कर्णधारपद भूषवले आहे. पण रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपद स्वीकारण्यास बुमराहने नकार दिला. फिटनेसच्या दृष्टीने पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ तीन कसोटी खेळणे शक्य असल्याचे कारण त्यावेळीच बुमराहने दिले होते. त्यामुळे कर्णधार म्हणून नव्या दमाच्या शुबमन गिलची निवड करण्यात आली. बुमराह पहिल्या कसोटीत खेळला. आता उर्वरित चार पैकी बुमराह कुठले सामने खेळणार? असा सवाल शुबमन गिलला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला- "त्याबद्दलचा निर्णय आम्ही प्रत्येक सामन्याच्या आधी घेऊ. मोठ्या विश्रांतीनंतर जेव्हा सामना खेळायची वेळ जवळ आली असेल तेव्हा आम्ही जसप्रीत बुमराहबाबतचा निर्णय घेऊ आणि तसे स्पष्ट करू."
शुबमन गिल सामन्याबद्दल काय म्हणाला?
"पहिली कसोटी खरोखरच खूप चांगली रंगली. आमच्याकडे संधी होती, पण आम्हाला संधीचं सोन करता आलं नाही. तळाच्या फलंदाजांनी काहीसे निराश केले. मात्र या संघाचा मला अभिमान आहे. आम्ही खूप चांगले प्रयत्न केले. ४३०च्या आसपास धावा करून डाव घोषित करायचा आमचा विचार होता, पण तसे झाले नाही. आमचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. पुढच्या सामन्यांमध्ये आम्हाला यात सुधारणा करावी लागणार आहे. आमचा संघ युवा आहे. सध्या शिकत आहे. या बाबींवर पुढच्या काळात चांगलं काम होईल," असे गिल म्हणाला.